बीड, 1 फेब्रुवारी : बीड जिल्ह्यातील शेतकरी हा नेहमी अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत असतो. कधी आला तर कधी कोरडा दुष्काळ या शेतकऱ्यानं सहन केलाय. पाण्याची टंचाई ही बहुतेक शेतकऱ्यांची मुख्य अडचण आहे. या सर्व अडचणींवर मात करत जिल्ह्यातील अनेक शेतकरी आधुनिक शेती करत असून त्यांच्या या प्रयोगांना आता फळ मिळत आहे.
खडकाळ भागात बहरली मिरची
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील तुकुचीवाडी हे डोंगराळ भागातील गाव आहे. या गावातील जमीन खडकाळ आहे. शेतकऱ्यांना पीकासाठी पावसावर अवलंबून राहावे लागते. तसंच या ठिकाणी अनेक शेतकरी हे बाजरीसारखं एकच पीक घेतात. इतर पिकांची लागवड फारशी केली जात नाही.
या गावातील तरुण शेतकरी दादासाहेब चौरे यांनी आपल्या शेतामध्ये ही परिस्थिती बदलण्याचं ठरवलं. त्यांनी वीस गुंठे क्षेत्रावर मिरचीची लागवड केली. या वीस गुंडे क्षेत्रात आठ तोडणीतून पंधरा टन हिरव्या मिरचीचं उत्पन्न निघणार असून त्यांना आता खर्च वजा करता साडेतीन लाखांचे उत्पन्न होणार आहे.
दुष्काळग्रस्त बीडमध्ये फुलवले झेंडू, आज करतोय लाखोंची कमाई, पाहा PHOTO
कशी सुचली कल्पना?
रब्बी हंगामात इतर पिकांचं उत्पन्न काढता येतं हा विचार करुन चौरे यांनी मिरचीची लागवड करण्याचं ठरवलं. त्यांनी यासाठी ड्रीप आणि मल्चिंगचा वापर करत अंकुर एचआरसीएच 2121 या मिरचीच्या सात हजार रोपांची लागवड केली. त्यांना यामध्ये कृषी तज्ज्ञ अरविंद भांगे यांनी मार्गदर्शन केले.
चौरे यांचा हा प्रयोग चांगलाच यशस्वी झालाय. पहिल्या तोडणीमध्ये पाच क्विंटल हिरवी मिरची निघाली असून पुढील प्रत्येक तोडणीमध्ये दोन टन मिरची निघणार आहे. या हंगामात अशा प्रकारच्या सात ते आठ तोडण्या होणार असून पंधरा टन हिरवी मिरची निघणार आहे. त्यामुळे अवघ्या वीस गुंठ्यात त्यांना साडेतीन लाखांचे उत्पन्न हाती येईल.
'आम्ही यापूर्वी पारंपारिक शेती करत होतो. या परिसरात पाण्याची कमतरता असल्यानं कोणताही शेतकरी आधुनिक शेतीकडं वळत नव्हता. मी माझ्या वीस गुंठे शेतीमध्ये हिरव्या मिरचीचा यशस्वी प्रयोग केला आहे,' असं दादासाहेब चौरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Beed, Farmer, Local18, Success story