रोहित देशपांडे, प्रतिनिधी
बीड, 7 फेब्रुवारी : बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ऊसतोडणीच्या हंगामात सर्वाधिक कामगार बीड जिल्ह्यातून देशभर जातात. संपूर्ण देशाची गरज भासवणाऱ्या या जिल्ह्यातच सध्या ऊसतोड कामगारांची कमतरता भासत आहे.
काय आहे समस्या?
बीड जिल्ह्यात जवळपास 8 लाख ऊसतोड कामगार आहेत. यामधील 50 टक्के कामगार दरवर्षी हंगाम सुरू झाल्यानंतर कामासाठी परराज्यात जातात. बीड जिल्ह्यामध्ये साखर कारखान्याचा हंगामा सुरू होऊन तिसरा महिना उलटला आहे तरी जिल्ह्यातील माजलगाव, तालुक्यामध्ये जवळपास 10 हजार हेक्टर, वरील ऊस शेतातच उभा आहे.
अनेक साखर कारखाण्यांनी ऊस टोळ्यांशी करार केला असला तरी जास्त पैसा मिळत असल्यानं कामगारांचा परराज्यात जाण्याचा कल वाढलाय. त्यामुळे मजुरांचा तुटवडा जाणवत आहे.
'शेतात गांजा लावू द्या', बेरोजगार अभियंत्याने केली मागणी, पत्र व्हायरल
किती आहे फरक?
बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना एका कोयत्याला 1 लाख ते 1 लाख 20 हजार रूपये मिळतात. तर कर्नाटकमध्ये याच कामासाठी 1 लाख 40 हजार ते 1 लाख 50 हजार दर आहे. एका कोयत्यामागे दर जास्त मिळत असल्यानं जिल्ह्यातील कामगार इतर राज्यात जात आहेत. परराज्यातील कारखानदार ऊस तोडणी कामगारांना अधिक दर देत असल्यानं जिल्ह्यातील कारखान्यांना कामगारांची कमतरता जाणवत आहे, असं मत शेतकरी नेते गंगाभीषण तावरे यांनी व्यक्त केलंय.
बीड जिल्ह्यातील माजलगावच्या लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्याने 4 लाख 44 हजार मेट्रिक टन इतकं गाळप केलं आहे. जय महेश कारखान्यानं 6 लाख 93 हजार 371 मेट्रिक टन तर छत्रपती कारखान्यानं 2 लाख 13 हजार 430 मेट्रिक टन गाळप आत्तापर्यंत केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Farmer, Local18, Sugarcane farmer