बीड, 24 ऑगस्ट : देशासह राज्यात एचआयव्ही बाधितांना मान सन्मान मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहिले आहे. परंतु अजुनही एचआयव्ही बाधितांना समाजात चांगले स्थान नसल्याच्या घटना आढळून येत आहेत. बीड जिल्ह्यात अशीच एक घटना घडल्याने मोठी खळबळ माजली आहे. (Beed Student) बीड तालुक्यातील पाली येथील जिल्हा परिषद शाळेतून पाच विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढल्याचा प्रकार घडला. यामुळे खळबळ उडाली असून, पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील पाली येथे एचआयव्ही बाधित मुलांचा सांभाळ इन्फंट इंडिया ही संस्था करत आहे. या संस्थेत जवळपास 64 विद्यार्थी वास्तव्यास आहेत. या संस्थेच्यावतीने 1 ली ते 5 वी पर्यंत शाळा घेतली जाते; परंतु शिक्षक येत नसल्याने पहिली ते पाचवीच्या वर्गातील पाच मुले पाली येथील जिल्हा परिषद शाळेत शिकण्यासाठी गेली. यावेळी येथील शाळा प्रशासनाने काही ग्रामस्थांच्या सांगण्यावरून आणि एचआयव्ही असल्याने त्यांना शाळेतून बाहेर काढल्याची तक्रार इन्फंटचे दत्ता बारगजे यांनी पालकमंत्री व शिक्षण विभागाकडे केली आहे.
हे ही वाचा : मुंडे, विलासराव, भुजबळ आणि खडसे, अनलकी ‘रामटेक’ यावेळी शिंदेंच्या या शिलेदाराला!
इन्फंट इंडिया या संस्थेच्या संचालिका संध्या बारगजे म्हणाल्या कि, जि. प. पाली येथील शाळेतून आमच्या पाच विद्यार्थ्यांना हाकलून दिले. इन्फंटच्या संस्थेतील प्राथमिक शाळेतील दोन्ही शिक्षक आतापर्यंत आलेले नाहीत. ही शाळा पालीच्या शाळेंतर्गत आहे. याबाबत आम्ही तक्रार केली आहे. या प्रकाराने आजही बाधितांना समाजात स्थान दिले जात नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, याची चौकशी करून योग्य ती कारवाई न झाल्यास जिल्हा परिषद शिक्षण विभागासमोर सत्याग्रह, बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही इन्फंट इंडिया संस्थेने दिला आहे.
यावर जिल्हापरिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक के. एस. लाड म्हणाले कि, पाच मुले आली होती. परंतु, इन्फंट संस्थेत असलेल्या शाळेतील शिक्षक जावेद शेख हे आले आणि या विद्यार्थ्यांना घेऊन गेले. आम्ही त्यांना हाकलून वगैरे दिलेले नाही. त्यांचा प्रवेशही आमच्याकडे नाही. याच इन्फंटमधील ६ वी ते १० वीचे विद्यार्थी आमच्याकडे आहेत. त्यामुळे आम्ही दुजाभाव करणार नाही. झालेले आरोप खोटे असल्याचे ते म्हणाले.
हे ही वाचा : महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरला भाजपला चित करण्याचा प्लान, जयंत पाटील म्हणाले..
याचबरोबर शिक्षक, इन्फंट संस्था बीडचे जावेद शेख हे म्हणाले कि, आठ दिवसांपासून मी आजारी होतो. दुसरे सहकारी शिक्षक रजेवर आहेत. मी शाळेवर गेलो त्यावेळी दुपारी मी पाली येथील शाळेतून पाच विद्यार्थी रिक्षा करून इन्फंटच्या संस्थेवर घेऊन गेलो. परंतु, संस्थेतील सरांनी मुलांना पाली येथील शाळेतच घालायचे आहे, असे सांगितले आणि पुन्हा त्यांना परत नेले. विद्यार्थ्यांना हाकलले नसून, मी स्वत: घेऊन गेलो होतो. झालेले आरोप व तक्रार निरर्थक असल्याचा खुलासा सरांनी दिला आहे.

)







