रोहित देशपांडे, प्रतिनिधी
बीड, 18 मार्च: संपूर्ण राज्यभर सध्या अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. कुठे गाराचा पाऊस, तर कुठे वादळी पाऊस बरसत आहे. मात्र या पावसामुळे शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गाने हिरावून घेतला आहे. मागील दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
बीड, गेवराई, वडवणी, माजलगाव यासह इतर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. सकाळपासून बीडमध्ये ढग दाटून आले होते. अखेर दुपारनंतर या गाराच्या पावसाने हजेरी लावली. शहरी भागातील नागरिकांनी याचा आनंद घेतला, मात्र शेतकऱ्यांसाठी हा पाऊस चिंतेत टाकणारा आहे. बीड शहरात देखील तुफान गारा पडल्या आहेत. कलिंगड, मोसंबी, गहू, संत्रा, ज्वारी आणि आंब्यांच्या फळबागेसाठी हा पाऊस नुकसानदायी आहे. त्यामुळे या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवलीय.
गहू पिकाचे नुकसान
शहरापासून जवळच असणाऱ्या आनंदवाडी येथील शेतकरी बाबासाहेब खरसाडे यांनी दीड एकर क्षेत्रावर गव्हाची लागवड केली होती. दिवस-रात्र एक करत या पिकाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपले. गहू काढणीला आला असतानाच गारपीट झाली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणारे वादळी वारे आणि आता गारपीट यामुळे गव्हाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. तशीच अवस्था परिसरातील इतर गहू उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे.
शेतकऱ्यांनो सावधान! पुन्हा पावसाची शक्यता, 'या' पद्धतीनं घ्या पिकांची काळजी
नुकसान भरपाईची मागणी
बीडमध्ये ज्वारी आणि इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी हनुमान देवकते यांची काढणीला आलेली ज्वारी पावसाने झोडपल्याने खराब झाली आहे. आता या गारांच्या पावसामुळे लागवडीसाठी केलेला खर्च देखील निघणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.