सुशील राऊत, प्रतिनिधी औरंगाबाद, 11 फेब्रुवारी : शालेय जीवनातील महत्त्वाची समजली जाणारी दहावीची परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आलीय. त्यामुळे मुलांमध्ये तसंच पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. एससीसी बोर्डाच्या परीक्षेच्या पेपरची अनेकांना भीती असते. या परीक्षेत उत्तर पत्रिका कशी द्यावी, परीक्षेपूर्वी अभ्यास कसा करावा याचं विद्यार्थ्यांना टेन्शन असतं. तुम्हालाही टेन्शन असेल तर दहावीला शंभर पैकी शंभर टक्के मार्क्स मिळवणाऱ्या औरंगाबादच्या स्वराली जोशीनं दिलेल्या टिप्स नक्की समजून घ्या. कसा केला अभ्यास? औरंगाबाद शहरातील सिडको भागांमध्ये राहणारी स्वराली श्रीहरी जोशीला आठवी आणि नववीमध्ये ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागलं होतं. त्यामुळे दहावीत प्रवेश घेतल्यानंतर तिला दडपण आलं होतं. काही विषयांमध्ये सुधारणाही करायची होती. स्वरालीनं नियोजनबद्ध पद्धतीनं अभ्यास करण्यास सुरूवात केली. स्वरालीचा गणित हा विषय थोडा कच्चा होता. त्यामुळे तिनं गणिताकडं विशेष लक्ष दिलं. गणितामधील संकल्पना पाठ करण्याऐवजी त्या समजून घेण्यावर विशेष भर दिला. इंग्रजीमधील रायटिंग स्किल हा भाग 25 मार्कांचा असतो, त्यामुळे त्याचीही खास तयारी केल्याचं स्वरालीनं सांगितलं. कॉपी बहाद्दर सावधान! परीक्षा केंद्रावर आहे ‘तिसऱ्या डोळ्या’चा वॉच, Video कशी दिली परीक्षा? ‘दहावीची परीक्षा सुरू झाल्यानंतर ज्या विषयाचा पेपर आहे, त्या दिवशी विषयातील महत्त्वाचे मुद्दे वाचले. परीक्षेच्या दिवशी जास्त वाचन केल्यानं गोंधळ वाढतो. त्यामुळे जे मुद्दे अवघड वाटतात त्यावरच विशेष लक्ष दिलं. मी पेपर नेहमीच क्रमानं सोडवलाय जो प्रश्न समजत नसेल, अवघड वाटत असेल त्यावर जास्त वेळ न घालवता पुढील प्रश्न सोडवले आणि त्यानंतर उरलेल्या वेळेत त्या प्रश्नाला वेळ दिला,’ अशी माहिती स्वरालीनं दिली.
‘परीक्षेच्या कालावधीमध्ये मला माझ्या पालकांनी मानसिक आधार दिला. माझ्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची होती. मी या कोणतंही टेन्शन न घेता प्रसन्न मुडमध्ये परीक्षा दिली. मला सहज यश मिळालं. तुम्हालाही या पद्धतीनं चांगले मार्क्स मिळतील,’ असा सल्ला स्वरालीनं दिला आहे.