जालना, 21 जानेवारी : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच ठाकरे गटाकडून शिंदे गटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई व्हावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. सध्या हे प्रकरण घटनापीठाकडे आहे. मात्र या आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली तरी आम्ही बहुमत सिद्ध करू असं सूचक वक्तव्य बावनकुळे यांनी केलं आहे.
नेमकं काय म्हटलं बावनकुळे यांनी?
विरोधी पक्षातील काही आमदार भाजपात येण्याच्या तयारीत आहेत. ते भाजपात येवू नये म्हणून सरकार पाडण्याच्या आणाभाका घेतल्या जातात. त्यामुळे जेव्हा बहुमत सिद्ध करण्याची वेळ येईल तेव्हा आम्हाला 184 आमदारांचा पाठिंबा असेल असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. तसेच त्यांनी यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावला आहे.
हेही वाचा : तुमच्यामध्ये बाळासाहेब दिसतात, त्यामुळे..., जैन धर्मगुरूंची राज ठाकरेंकडे अनोखी मागणी
उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरे हे सोन्याच्या चमच्यानं ज्यूस पिऊन मोठे झाले आहेत. विकास हा उद्धव ठाकरेंच्या रक्तातच नाहीये, त्यामुळे त्या विषयावर बोलून काही फायदा नसल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. तसेच आज मनसे प्रमुख राज ठाकरे हे ठाणे दौऱ्यावर आहेत, ते जैन समाजाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी राज ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. राज ठाकरे यांनी जैन समाजाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली ही चांगली गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.