अविनाश कानडजे (औरंगाबाद), 23 ऑक्टोबर : मागच्या 15 दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. या परतीच्या पावसाने राज्यातील लाखो हेक्टर जमीनीतील पिकांचे नुकसान झाले आहे. याचा सर्वाधिक फटका विदर्भ, मराठवाडा, खानदेशात बसल्याने येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान पिकांचं नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी निराशेत जात असल्याचे दिसूत येत आहे. औरंगाबादमधील एका शेतकरी मुलाने शेतीचे नुकसान झाल्याची व्यथा मांडल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.
या व्हिडीओमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. तसेच ते त्या चिमुकल्या शेतकऱ्याच्या घरी भेट देऊन त्याला आधार देणार आहेत. याची माहिती समजताच शिंदे गटाचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी रातोरात त्या मुलाची भेट घेत त्याच्या कुटुंबीयांना 50 हजारांची मदत जाहीर केली.
हे ही वाचा : काल अमित शहांना शुभेच्छा, आज उद्धव ठाकरेंसोबत नार्वेकर असणार दौऱ्यावर, नाराजीची चर्चा गेली वाहून!
कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे रात्री 12 वाजता गंगापूर तालुक्यातील बुट्टेवडगाव आणि सिध्दनाथ वाडगाव येथे भेट दिली. गंगापूर तालुक्यातील सिध्दनाथ वाडगाव येथील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मुलगा ऋषीकेश ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या घरी जाऊन त्या मुलाची आणि त्यांच्या कुटूंबीयांची भेट घेतली. त्यांना दिवाळीसणासाठी फटाके, कपडे आणि इतर साहित्य मिठाई तसेच 50 हजार रुपये रोख अशी मदत दिली आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज गंगापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्या अगोदरच कृषिमंत्र्यांनी लावलेल्या हजेरीमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज औरंगाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पाहणीचा दौरा आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर असणार आहेत.
हे ही वाचा : शेतकऱ्यांना 1 रुपयाही डोंगराएवढा वाटतोय, 50 खोकेवाल्यांना कधी समजणार?; राजू शेट्टींचा प्रहार, म्हणाले..
अतिवृष्ठीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं हाती आलेलं पिक आडवं झालंय. दिवाळी सणाच्या तोंडावरच अस्मानी संकटात उद्धवस्त झालेल्या बळीराजाच्या बांधावर उद्धव ठाकरे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. या दौऱ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परीषद घेऊन राज्य सरकारकडे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी करणार असल्याची माहिती मिळत आहे.