सांगली, 02 नोव्हेंबर : बेघरांसाठी सांगलीतील सावली बेघर निवारा केंद्र आधार ठरला आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याकडून बेघरांच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण करण्याचं काम सुरू आहे. जवळपास 65 हून अधिक बेघर सध्या या सावली निवारा केंद्रात आश्रयाला आहेत. तर आत्तापर्यंत 700 ते 800 लोकांना इथं आसरा मिळाला आहे. सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा मुजावर या तरुणाच्या नेतृत्वाखाली हे केंद्र सुरू आहे.
रस्त्यावर फिरणाऱ्या बेघरांसाठी सांगलीतील सावली बेघर निवारा केंद्र आधार बनला आहे. गेल्या 5 वर्षांपासून सांगलीमध्ये जिल्ह्यातील शेकडो बेघर, अनाथांना सावलीचा आसरा मिळाला आहे. सांगली महानगरपालिका आणि इंसाफ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हे सावली बेघर निवारा केंद्र चालवले जात आहे. सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा मुजावर या तरुणाच्या नेतृत्वाखाली हे केंद्र सुरू आहे.
सांगली शहरातलं सावली बेघर निवारा केंद्र बेघरांसाठी आता हक्काचं घर बनले आहे. या ठिकाणी बेघर म्हणून दाखल होणाऱ्या व्यक्तींची पूर्ण देखभाल केली जाते. अगदी त्यांना स्वच्छ करण्यापासून त्यांची निगा राखण्यापासून त्यांच्या आरोग्याचीही काळजी अगदी घरच्या कुटुंबाप्रमाणे निवारा केंद्रात घेण्यात येते. अनेक सामाजिक संस्था देखील या सावली बेघर केंद्राला मदतीचा हात देण्यासाठी पुढे येतात.
महापालिकेनं शाळा दिली
5 वर्षांपूर्वी बेघरांसाठी निवाऱ्याच कोणतच केंद्र नव्हतं. त्यावेळी रस्त्यावर फिरणाऱ्या बेघरांच्यासाठी औषधोपचार किंवा त्यांची निगा राखण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत असे. यातून सांगली महापालिका आणि इंसाफ फाउंडेशनच्या माध्यमातून निवारा केंद्रासाठी प्रयत्न सुरू झाले. महापालिकेच्या वतीने पडीक बनलेली महापालिकेची शाळा देऊ करण्यात आली. आता या शाळेचं संपूर्ण रुपडे पालटले आहे. सध्याच्या घडीला सावली बेघर निवारा केंद्रात 65 बेघर अनाथ मनोरुग्ण वास्तव्यास आहेत. या ठिकाणी रोज नियमितपणे चहा नाष्टा, जेवण आणि औषध उपचारांची सोय केली जाते.
Video: थंडीत अंग ठणकतयं? त्रास कमी होण्यासाठी 'या' टिप्स ठरतील फायदेशीर
700 ते 800 लोकांनी आसरा
सावली बेघर निवारा केंद्राच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांमध्ये 243 लोकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात यश, तर आत्तापर्यंत 700 ते 800 लोकांनी आसरा मिळाला आहे. केंद्राचे प्रमुख मुस्तफा मुजावर हे न्यूज 18 लोकलशी बोलताना म्हणाले की, सुरुवातीच्या काळात बेघरांची निवाऱ्याची मोठी समस्या होती. उपचार करण्यापासून त्यांना स्वच्छ ठेवून त्यांची देखभाल करणे हा मोठा गंभीर प्रश्न होता. मात्र महापालिकेच्या माध्यमातून तो प्रश्न मार्गी लागला आहे आणि गेल्या चार वर्षांपासून बेघरांना हक्काचं घर मिळत आहे.
व्यवसायासाठी हातभार
काही बेघरांना पुन्हा सुस्थितीत आणून त्यांच्या व्यवसायासाठी हातभार देखील केंद्राच्या माध्यमातून लावण्यात आला आहे. त्यामुळे काहीजण आता आपला स्वतःचा व्यवसाय देखील करत आहेत. ज्या मनोरुग्ण बेघरांना नाव नाही अशांना आम्ही नाव देतो. जर एखादा बेघर मंदिराच्या समोर आढळला, तर त्या मंदिराच्या नावाने म्हणजे महादेव मंदिरासमोर असले तर त्याला महादेव असं नाव दिलं जातं. कोणत्याही प्रकारची जात पात पाळली जात नाही सर्व सण उत्सव हे मोठ्या आनंदात साजरे केले जातात. महापालिकेबरोबर सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांचा देखील या सावली बेघर निवारा केंद्राला नेहमीच हातभार राहिला आहे, असं आवर्जून मुस्तफा मुजावर हे सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.