भाईंदर, 24 जुलै : मुंबई (mumbai) जवळील भाईंदरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाईंदर आणि नायगाव रेल्वे स्थानकादरम्यान (Naigaon Railway Station) असलेल्या रेल्वे पुलावरून एका 16 वर्षीय मुलीने समुद्रात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने या मुलीचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. या संपूर्ण घटनेचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ही मुलगी मानसिक तणावात असल्याची माहिती समोर आली. यातून तिने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. ही मुलगी नायगाव आणि भाईंदर रेल्वे स्थानक जोडणाऱ्या रेल्वे पुलावर उभी होती. ती बराच वेळ पुलाकडेला उभी असल्याने समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांची नजर तिच्यावर पडली.
स्थानिकांनी तिला आवाज देऊन विचारणा केली पण तिने काहीही उत्तर दिले नाही. मुलगी ही पुलाच्या कठड्यावर येऊन बसली. त्यामुळे पुढे काय होणार याची जाणीव मच्छिमारांना झाली. त्यांनी याबाबतची माहिती तातडीने रेल्वे पोलिसांना देण्यासाठी निघाले. मात्र त्याआधीच या मुलीने समुद्रात उडी घेतली. ( ..अन् मुंबईत रेल्वे रूळावर पोहोचला; हरवलेल्या मुलासाठी लोको पायलट ठरला देवदूत ) त्यानंतर तेथे असलेल्या मच्छिमारांनी मोठ्या जिगरीने बुडणाऱ्या मुलीपर्यंत पोहचून तिचे प्राण वाचविले. त्यानंतर एका छोट्या बोटीच्या मदतीने तिला समुद्रकिनाऱ्यावर आणण्यात आले. ही मुलगी नालासोपारा परिसरात राहणारी असल्याची माहिती मिळत असून आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पीडित मुलीला ताब्यात घेतले असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.