मुंबई, 21 सप्टेंबर : उत्तम आरोग्यासाठी आहार खूप महत्त्वाचा आहे. आपल्या आहारातले अनेक पदार्थ आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात आणि त्यामुळे आपण आजाराला दोन हात लांब ठेवू शकतो. खाद्यसंस्कृतीत जसं आहाराचं महत्त्व विशद केलं आहे, तसंच महत्त्व अन्नपदार्थ शिजवण्याचंही आहे. भारतात (Rice) आहारातील सर्वात मुख्य पदार्थ आहे तो म्हणजे भात. भारतात कुठेही जा, तुम्हाला बहुतेक घऱात भारत खायला मिळेल. पण आपल्या दैनंदिन आहारात असलेला भातही कॅन्सरसाठी (Cancer) कारणीभूत ठरू शकतं (Rice cause cancer), असं नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आलं आहे (Undercooked rice cause cancer).
भात हा व्हिटॅमिन (Vitamin) आणि मिनरल्सचा (minerals) मोठा स्रोत मानला जातो. कार्बोहायड्रेटयुक्त भात भूक कित्येक तास शांत ठेवतो. परंतु हा भात योग्य पद्धतीनं न शिजवता खाल्ला तर त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम (Side effect of undercooked rice) होतात. विशेषतः अर्धवट शिजलेला भात खाल्ल्याने कॅन्सरचा धोका असतो.
खरं तर सध्याच्या काळात अनेक अन्नपदार्थ रसायनांशिवाय तयार होऊ शकत नाहीत. त्यातच आपण अशा अन्नपदार्थांचं सेवन निष्काळजीपणानं करतो. त्यामुळे त्याचा परिणाम साहजिकच आरोग्यावर होतो. इंग्लंडमधल्या 'क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्ट'च्या संशोधनानुसार, पिकांचं किडींपासून संरक्षण व्हावं आणि चांगलं उत्पादन हाती यावं, यासाठी ज्या रसायनांचा आणि कीटकनाशकांचा वापर होतो, त्यात आर्सेनिक असतं.
हे वाचा - आहारात Vitamin D च्या समावेशामुळे कमी होत आहे कोरोनाचा धोका?
आर्सेनिक हे रसायन अनेक प्रकारच्या मिनरल्समध्ये आढळतं. याचा वापर औद्योगिक कीटकनाशकांमध्ये होतो. अनेक देशांमधल्या भूजलातही आर्सेनिकचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलं आहे. यामुळे आर्सेनिक विषबाधेचा (Poisoning) धोका वाढतो. त्यामुळे उलट्या, पोटदुखी, डायरिया आणि अगदी कॅन्सरही होऊ शकतो.
तांदळात आर्सेनिकचं (Arsenic) प्रमाण जास्त आढळतं. अनेक संशोधनांच्या दाव्यानुसार, भात कार्सिनोजेनिक असून त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. 90 च्या दशकात कॅलिफोर्निया टीचर्स स्टडीजनं महिलांमधल्या स्तनाच्या कर्करोगासह अन्य प्रकारच्या कर्करोगांबाबत अभ्यास केला असता, त्यांना त्यात संभाव्य धोके आढळून आले होते. वारंवार तपासणीअंती 9400 स्वयंसेवक कर्करोगग्रस्त असल्याचं स्पष्ट झालं होतं आणि त्यात स्तन आणि फुफ्फुसाच्या कर्करोगग्रस्तांचं प्रमाण आधिक होतं.
हे वाचा - वजन नियंत्रणासह ताकाचे इतके सारे आहेत फायदे; लस्सीही तुमच्यासाठी आहे उपयोगी
तांदूळ नीट शिजवून न खाल्ल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. असा भात खाल्ल्यानं कर्करोग होण्याची शक्यता बळावते. चांगल्या आरोग्यासाठी अर्धवट शिजलेल्या भाताऐवजी पूर्ण शिजवलेला भात खाणं श्रेयस्कर असतं. त्यामुळे भातासाठी तांदूळ शिजवण्यापूर्वी रात्रभर पाण्यात भिजवावेत आणि मग शिजवावेत. यामुळे त्यातल्या विषारी पदार्थांचं प्रमाण 80 टक्क्यांपर्यंत कमी होतं, असं संशोधकांनी स्पष्ट केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.