विठ्ठल भाडमुखे, प्रतिनिधी नाशिक, 4 मे : भारतात प्रत्येक भागाची वेगळी खाद्य संस्कृती आहे. महाराष्ट्रातही प्रत्येक शहरात प्रसिद्ध असा एखादा पदार्थ असतोच. तसंच नाशिक म्हटलं की मिसळ आठवते. या मिसळने नाशिकचं नाव हे सातासमुद्रापार नेलं आहे. आजही नाशकात कुठूनही पर्यटक आले तरी मिसळवर ताव मारल्याशिवाय जात नाहीत. शहराच्या अगदी गल्ली गल्लीत चमचमीत मिसळ मिळते. अभ्यासकांच्या माहितीनुसार या मिसळला तब्बल 150 वर्षांची परंपरा आहे. नाशिकच्या मिसळला मोठी परंपरा नाशिकमधील कमल विजय हॉटेल, भगवंत मिठाई, गंगा टी हाऊस, सिताबाईंची मिसळ हे फार जुने आहेत. इथे अगदी 100 वर्षांपूर्वी मिसळ मिळायची. त्यामुळे नाशिकच्या मिसळला मोठी परंपरा आहे. दिवसेंदिवस मिसळच्या प्रकारात रंजक बदल होत गेले. पूर्वी चुलीवरची मिसळ चांगली प्रसिद्ध होती. नंतर कोळशावरची मिसळ आली. पुढे डिझेलच्या भट्ट्यांवर मिसळ बनवली जायची. त्यानंतर गॅस आले आणि त्यावर मिसळ बनवायला लागले. आता पुन्हा एकदा जिथून सुरुवात झाली होती त्याच चुलीवरच्या मिसळला खवय्यांची मागणी वाढली आहे. तो एक ब्रँड तयार झाला असून नाशिक म्हटलं की चुलीवरची मिसळ प्रसिद्ध आहे.
गरिबांचं खाद्य झालं खाद्य संस्कृतीचा भाग पूर्वी आठवडे बाजार नाशिक शहरात भरायचे. तेव्हा काही निवडक हॉटेलमध्ये मिसळ मिळायची. पूर्वी मिसळ हा गरिबांचा पदार्थ म्हणून ओळखला जायचा. कारण घरात जे शिल्लक उरलेले असेल मूग, पोहे, खिचडी असं एकत्रित करून खायचे आणि त्याला मिसळ म्हटल जायचं. मात्र याच मिसळने काही काळानंतर हॉटेल मध्ये स्थान मिळवलं. मग आठवडे बाजारात मिसळ मिळायची. ग्रामीण भागातील लोक काही कामानिमित्त शहरात आले की ते सोबत भाकरी घेऊन यायचे आणि इथं आल्यानंतर ते मिसळ सोबत भाकरी खायचे. पुण्यात फक्त 99 रुपयांना मिळते अनलिमिटेड मिसळ! पाहा खास Video 40 वर्षांपूर्वी मिसळसोबत आला पाव 40 वर्षांपूर्वी पाव आले, मात्र पाव हा पारशी आणि ख्रिचन लोकांचा खाद्यपदार्थ म्हणून ओळखला जायचा. परंतु असा ही त्यावेळी एक गैरसमज समाजात पसरला होता की पाव खाण म्हणजे धर्मांतर करणं. धर्मांतरासाठी पावाची निर्मिती करण्यात आली आहे, अशी चर्चा सर्वत्र होती. त्यामुळे अनेक जण मिसळ सोबत पाव खात नव्हते. हळूहळू शैक्षणिक दृष्ट्या प्रगती झाल्यानंतर खेडोपाड्यातील विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी येऊ लागले. पण त्यावेळी परिस्थिती नाजूक असल्यामुळे अनेकांना आर्थिक चणचण भासायची. जास्त पैसे नव्हते त्यामुळे एक मिसळ आणि बारा पाव घेऊन त्यात सात आठ जण भागवायचे, असं चालायचं. विशेष म्हणजे नाशिकमध्ये मिसळसोबत तर्री आणि रस्सा भरपूर दिला जातो. त्यामुळे सर्वजण मिसळवर मस्त ताव मारतात, असं अभ्यासक हेमंत भोसले सांगतात.