मुंबई, 29 ऑगस्ट: डायबेटिस (Diabetes) हा जगभरात मोठ्या प्रमाणावर होत असलेला आजार आहे. जीवनशैलीतील बदल हे या मागचं प्रमुख कारण आहे. सामान्यपणे डायबेटिस म्हणजे रक्तातील साखरेची पातळी वाढणं असंच गृहीत धरलं जातं. याला हायपरग्लायसेमिया (Hyperglycemia) असं म्हणतात. त्यात रक्तातील साखरेचं प्रमाण सतत वाढून कालांतरानं त्याचे शरीरावर दुष्परिणाम दिसू लागतात. या व्यतिरिक्त हायपोग्लायसेमिया (Hypoglycemia) या प्रकारात रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण कमी होतं. त्याचे शरीरावर तत्काळ परिणाम दिसतात. काहीवेळा ते जीवघेणेही ठरू शकतात. त्याकरता त्याची लक्षणं जाणून घेतली पाहिजेत. “रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलं, तर काही काळानंतर किडनी, डोळे, हृदयाचं कार्य बाधित होतं. मात्र साखरेचं प्रमाण कमी झालं, तर चिडचिड, अस्वस्थता, घाम येणं, प्रचंड भूक लागणं, मूड बदलणं अशी लक्षणं दिसू लागतात. अशा परिस्थितीत शरीरातील साखरेची पातळी लगेचच वाढवावी लागते. नाहीतर कोमात जाणं, फिट (Seizures) येणं असे गंभीर परिणाम होऊ शकतात,” असं आहारतज्ज्ञ करिश्मा शाह यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय. त्याची काही लक्षणंही त्यांनी दिली आहेत. 1. प्रचंड भूक लागणं- काहीवेळा अचानक प्रचंड भूक (Ravenous Hunger) लागल्यासारखं वाटतं. हे रक्तातील साखर कमी झाल्याचं लक्षण असतं. सामान्यपणे भूक लागल्यावर अस्वस्थ वाटत नाही. पण साखर कमी झाली, तर भूक लागल्याची प्रचंड जाणीव होते, घाम येतो व खात नाही तोवर अस्वस्थ वाटतं. असं होत असेल, तर प्रत्येक नाश्त्यावेळी 15 ते 20 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स घ्यावेत, तर जेवणामध्ये 40 ते 65 ग्रॅम घ्यावेत. 2. भावनिक अस्वस्थता- सतत मूड (Mood Changes) बदलणं, भावनिक अस्वस्थता (Emotional Instability) वरचेवर येत असेल, तर हे हायपोग्लायसेमियाचं लक्षण असू शकतं. काहीवेळा यामुळे निराशा, त्रासलेपणाही येऊ शकतो. 3. सतत चिंता वाटणं- रक्तातील साखरेचं प्रमाण जेव्हा कमी होतं, तेव्हा शरीरात Epinephrine (Adrenaline) आणि Cortisol हे दोन हॉर्मोन्स स्रवतात. या हॉर्मोन्समुळे रक्तात अधिक साखर पाठवण्याविषयी यकृताला संदेश मिळतो. यामुळे सतत काळजी, चिंता (Anxiety) वाटत राहते. **हेही वाचा-** Migraine Home Remedy : मायग्रेनच्या त्रासावर उपयोगी ठरते हळदीचे दुध, हे पदार्थ खाल्ल्यानेही होतो फायदा
4. एकाग्रतेत अडचण- मेंदूचं काम सुरळीत चालण्यासाठी रक्तातील साखर खूप महत्त्वाची असते. त्यामुळेच शरीराला ऊर्जा मिळते. ही साखर कमी झाली, तर मेंदूचं कार्यही प्रभावित होतं. यामुळेच कोणतंही काम करताना एकाग्र होण्यात (Concentration) समस्या येऊ शकतात. 5. बोलण्यात अडचण- शरीरातील साखर अचानक कमी झाल्यानं काही सुचत नाही. गोंधळ उडतो. बोलणं मंदावतं. साखर 40 mg/dL पेक्षा कमी झाल्याचं हे प्रमुख लक्षण असतं. साखर कमी झाली, तर ग्लुकोज टॅब्लेट घेणं, एखादं चॉकलेट किंवा फळांचा रस पिणं हे करता येतं. हा आजार असलेल्यांनी स्वतःजवळ कायमच ग्लुकोज ठेवणं आवश्यक असतं. अस्वस्थ वाटत असेल, तर कुटुंबियांना किंवा मित्रमंडळींना तत्काळ सांगितलं पाहिजे. यामुळे पुढील धोका टाळता येईल.