नवी दिल्ली, 20 एप्रिल : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Coronavirus 2nd Wave) देशात हाहाकार माजवला आहे. गेल्या 12 दिवसांत पॉझिटिव्हिटी रेट दुप्पट झाला आहे. तर 10 राज्यांत 78 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. देशात ज्याप्रमाणे कोरोनाची पहिली लाट ओसरली तशी आता दुसरी लाट कधी ओसरणार असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. पण तज्ज्ञांच्या मते, पुढील तीन आठवडे खूप महत्त्वपूर्ण आहेत. कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार याबाबत तज्ज्ञांमध्ये मत-मतांतरे आहेत. सेंटर फॉरसेल्युलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजीचे संचालक डॉक्टर राकेश मिश्रा यांच्या मते, पुढचे तीन आठवडे भारतासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. यादरम्यान लोकांना कोरोनाचे नियम पाळावे लागतील. ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना डॉक्टर मिश्रा म्हणाले, रुग्णालयामध्ये बेड्स,ऑक्सिजन सिलेंडर आणि लशीची कमतरता कायम राहिल्यास देशात भयंकर स्थिती उद्भवेल. त्यामुळे पुढचे तीन आठवडे देशासाठी महत्त्वपूर्ण आहेत. लोकांना कोरोनाचे नियम पाळावे लागतील. नाहीतर इटलीची परिस्थिती आपण सर्वांनी पाहिली आहे. इटलीत ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांचा जीव गेला. हे वाचा - सावधान! कोरोनापासून बचाव करताना तुम्ही गंभीर आजाराला निमंत्रण तर देत नाहीयेत ना? कोरोनाची दुसरी लाट येणार हे निश्चित होतं. गेल्या काही महिन्यांत अनेकांनी सांगितलं की विषाणूचा प्रभाव कमी झाला आहे. मात्र हा विषाणू पूर्णपणे नष्ट झालेला नाही. त्यामुळे अशा परिस्थितीसाठी आपण तयार राहायला हवं. भारतात दुसऱ्या लाटेत आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे संक्रमण वेगाने वाढत आहे, असं मिश्रा यांनी सांगितलं. लोकांनी घराबाहेर पडताना, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणं सोडलं आहे, हेदेखील कोरोनाचं संक्रमण वेगाने वाढण्याचं एक मुख्य कारण आहे. या महासाथीला हरवण्यासाठी लस हे सर्वात मोठं शस्त्र आहे. मात्र तरीही लोकांनी नियम पाळणं अत्यंत गरजेचं आहे. कारण बऱ्याच प्रकरणांमध्ये लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हा विषाणू हवेतून पसरतो. त्यामुळे मास्क लोकांना कोरोनाची लागण होण्यापासून 80 ते 90 टक्के वाचवू शकतो, असं मिश्रा म्हणाले. हे वाचा - सावधान! कोरोनापासून बचाव करताना तुम्ही गंभीर आजाराला निमंत्रण तर देत नाहीयेत ना? भारतात कोरोनाच्या दैनंदिन संक्रमणाचा दर गेल्या 12 दिवसांत दुप्पट होऊन 16.69 टक्के झाला आहे. तसंच आठवडी संक्रमणाचा दर 13.54 टक्क्यांवर पोहोचला आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ, गुजरात, तामिळनाडू आणि राजस्थानमध्ये या दहा राज्यांत 78.56 टक्के रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये सर्वाधिक आठवडी संक्रमण दर 30.38 टक्के आहे. त्यापाठोपाठ गोवा 24.24 टक्के, महाराष्ट्र 24.17 टक्के, राजस्थान 23.33 टक्के आणि मध्य प्रदेशात 18.99 टक्के आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.