कोल्हापूर, 25 जुलै : कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy rainfall in Kolhapur) पूरस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान आता भूस्खलन (Landslide) झाल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा (Gaganbavada) तालुक्यातील अणदूर धुंदवडे रस्ता तब्बल 15 फूट खचला असल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी भूस्खलन होण्याच्या घटना समोर येत आहेत. अणदूर धुंदवडे रस्ता खचल्याने आजूबाजूच्या पंधरा-वीस गावांचा संपर्क तुटला आहे. काल ही घटना घडली आहे. नेटवर्क नसल्याने याबाबत कोणालाच कल्पना नव्हती. आज पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिक जेव्हा घराबाहेर पडले तेव्हा हा प्रकार समोर आला आहे.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे#Kolhapur #Rain #Landslide pic.twitter.com/FVxuiGfc8I
— News18Lokmat (@News18lokmat) July 25, 2021
konkan flood : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीस-राणे कोकणाच्या दौऱ्यावर
कोल्हापूर जिल्ह्यात आता पावसाचा जोर ओसरला आहे. काल दिवसभरात कोल्हापूर शहरात पावसाने हजेरी लावली नाही, त्यामुळे कोल्हापुरकरांची महापुरातून सुटका होणार आहे. पण अजूनही अनेक भागात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 97 बंधारे अजूनही पाण्याखाली असून पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 52 फुटांवर येऊन पोहोचली आहे. शुक्रवारी रात्री हीच पातळी 56 फुटांवर होती, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा मोठा धोका निर्माण झाला होता.
आता पावसाने उसंत घेतल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यावरच मोठ संकट टळलंय. दरम्यान राधानगरी धरण हे आज शंभर टक्के भरण्याची शक्यता असून त्याचे स्वयंचलित दरवाजे उघडल्यानंतर पंचगंगा नदीत पुन्हा पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.