मुंबई, 16 जुलै- मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते विजू माने नेहमीच आपल्या बिनधास्त स्वभावाची ओळखले जातात. ते सतत समाजातील विविध प्रश्नांवर मनमोकळेपणाने आपलं मत मांडत असतात. त्यांचा स्पष्ट आणि मनमोकळा स्वभाव अनेक लोकांना आवडतो. त्यांच्या सोशल मीडियावर आपल्याला अनेक प्रकारच्या पोस्ट पाहायला मिळतात.आजही अशीच एक खास पोस्ट चर्चेत आली आहे. मनोरंजनसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे सोशल मीडियावर स्पष्टमपणे आपलं मत व्यक्त करत असतात. त्यातीलच एक नाव म्हणजे विजू माने होय. विजू माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत आपल्या हटके पोस्टमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांकडून पसंती मिळत असते. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘धर्मवीर’ फेम प्रसाद ओकसाठी पोस्ट लिहत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यांनतर आता त्यांची नवी पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ही पोस्ट काहीशी राजकीय पार्श्वभूमीवर आधारित असलेली दिसून येत आहे. पाहूया त्यांनी नेमकं काय लिहलंय. विजू माने इन्स्टाग्राम पोस्ट- (ता.क.: स्ट्रगलर साला सीजन-3 ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रिलीज होणार आहे. आता पुढे वाचा.) राजकारणावर हक्काने बोलणं हा जवळपास प्रत्येक शेंबड्या पोराचा जन्मसिद्ध अधिकार असतो. राजकारण हा गप्पा मारण्याचा सर्वात सोप्पा विषय असतो. अर्थात राजकारणी माणसांना भरघोस शिव्या देणे, त्यांच्यामुळे आपल्या देशाची कशी वाट लागली अन्यथा आपला देश अमेरिकेपेक्षा खूप पुढे असता, आपला देश हा राजकारण्यांनी कसा लुटला वगैरे वगैरे उद्वेगातून आलेली मतं असू शकतात.या राजकारण्यांना चौकात xxx करून मारलं पाहिजे वगैरे वगैरे काल्पनिक शौर्य कथा आजूबाजूला ऐकू येत असतात. शिवाय कोणता पक्ष कसा ‘चालू’ आहे आणि कोणता ‘बंद’ पडणार आहे याच्या राजकीय विश्लेषक असल्यासारख्या चर्चा घरी, ऑफिसमध्ये, बसमध्ये, ट्रेनमध्ये, रिक्षामध्ये, सोशल मीडियावर, ‘न सोसल’ अशा मीडियावर, पानपट्टीवर, चहाच्या टपरीवर, बारमध्ये, सगळीकडेच कानावर आदळत असतात.
**(हे वाचा:** टीव्हीवरील प्रसिद्ध नायिका दीपू-अप्पू येणार एकत्र; काय आहे कारण? ) या ऐकत असताना राजकारणावर खरंतर…राजकारणा’खाली’ असलेला एक पदर उलगडून काढावा असं वाटलं. खाजगीत गप्पा मारत असताना काही मित्रांकडून राजकारणातले विनोदी, गमतीशीर किस्से ऐकायला मिळत असतात. एकंदर महाराष्ट्रात जगाने दखल घ्यावी असं राजकीय घटनासत्र सुरू असताना, मला ही मालिका सापडावी हा निव्वळ योगायोग आहे. खरं तर हा वेबीसोड या सगळ्या घटनांच्या आधीच चित्रित झालेला आहे. या सगळ्या मतमतांतरामधून काही घटका करमणूक व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम तुमच्यासमोर आणतो आहे. चूक भूल द्यावी घ्यावी. गोड मानून घ्या.