मुंबई, 19 जानेवारी- दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी बॉलिवुडमधील अष्टपैलू कलाकारांपैकी एक होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक सुपरहीट चित्रपट दिले. त्यांच्या मृत्यूनंतरही चाहत्यांमध्ये त्यांच्या अभिनयाची जादू अद्याप टिकून आहे. मात्र, याच श्रीदेवी एका मराठी अभिनेत्रीच्या अभिनय कौशल्यामुळे चिंतेत पडल्या होत्या. ‘गुमराह’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ही घटना घडली होती. या चित्रपटात श्रीदेवी मुख्य भूमिकेत होत्या तर मराठी अभिनेत्री रीमा लागू त्यांच्या आईच्या भूमिकेत होत्या. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोन्ही अभिनेत्रींचं बाँडिंग अतिशय चांगलं होतं. पण, नंतर श्रीदेवीला समजलं की रीमा लागू यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. रीमा आपल्यापेक्षा जास्त भाव खाऊन जातील अशी, भीती श्रीदेवी यांना वाटू लागली होती. ‘झी न्यूज’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. श्रीदेवीप्रमाणं रीमा लागूदेखील उत्कृष्ट अभिनेत्री होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक चांगल्या भूमिका केल्या आहेत. गुमराह चित्रपटामध्येही त्यांनी श्रीदेवीच्या आईची भूमिका करताना फार मेहनत घेतली होती. मात्र, असुरक्षित झालेल्या श्रीदेवीनं काहीही करून रीमा यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू केले होते. माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, श्रीदेवी यांनी निर्मात्यांना रीमाची भूमिका चित्रपटातून वगळण्यासाठी तयार केलं होतं. श्रीदेवी त्या काळात मोठ्या स्टार होत्या. त्यामुळे निर्मात्यांना त्यांचं म्हणणं ऐकावं लागलं. परिणामी रीमा लागू यांची भूमिका चित्रपटातून काढून टाकण्यात आली. **(हे वाचा:** Throwback Bollywood: कधीकाळी संजय दत्तच्या प्रेमात बुडाली होती माधुरी दीक्षित; का झाला नात्याचा शेवट? ) जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा रीमा यांना समजलं की, चित्रपटातील त्यांची भूमिका कट करण्यात आली आहे. पण, रिमा यांनी याबाबत कोणालाही दोष दिला नाही किंवा त्याबद्दल चर्चाही केली नाही. रीमा लागू यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या आईची भूमिका उत्तम प्रकारे साकारली होती. 2017 मध्ये वयाच्या 59 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. त्यानंतर वर्षभरातच, म्हणजे 2018 मध्ये श्रीदेवी यांचाही वयाच्या 54 व्या वर्षी गूढ मृत्यू झाला. दुबईत एका लग्नात सहभागी होण्यासाठी गेलेल्या श्रीदेवी बाथटबमध्ये बुडलेल्या अवस्थेत आढळल्या होत्या.
दोन दिग्गज कलाकार एखाद्या चित्रपटात काम करत असतील तर त्यांच्या मनात एकमेकांबाबत असुरक्षिततेची भावना असते. रंगभूमी, हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्येही अशा गोष्टी अनेकदा पाहायला मिळतात. रीमा लागू आणि श्रीदेवी यांच्या बाबतीतही हेच झालं होतं.