मुंबई, 02 मार्च : बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौत (Kangana ranaut)आणि तिची बहिण रंगोली चंडेल (rangoli chandel) यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. महाराष्ट्रामध्ये दाखल करण्यात आलेले तिन्ही खटले हिमाचल प्रदेशमधील न्यायालयात हलवण्यात यावे अशी मागणी कंगनाने केली आहे.
शिवसेनेच्या नेत्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा कंगना रनौतने केला आहे. कंगनावर तीन खटले सुरू आहे. वादग्रस्त ट्वीट केल्या प्रकरणी कंगनावर खटला सुरू आहे.
अली काशिफ खान आणि मुनव्वर अली सय्यद यांनी दोन खटले दाखल केले आहे. यामध्ये कंगनाच्या ट्वीटमुळे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण केला जाण्याचा आरोप करण्यात आला आहे. तर तिसरा खटला हा गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केला आहे. जुहू पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी तक्रार केली होती. कंगनानं मानहानी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जावेद अख्तर यांनी अंधेरी कोर्टात कंगनाविरोधात मानहानीचा दावा ठोकला होता. एका मीडिया चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत कंगनानं आपली बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कंगना आणि रंगोलीने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. जर मुंबई या प्रकरणाची सुनावणी सुरू राहिली तर शिवसेनेच्या नेत्यांकडून आपल्या जीवाला धोका आहे. त्यामुळे या तिन्हा प्रकरणावरील सुनावणी ही हिमाचल प्रदेशमधील न्यायालयात व्हावी, अशी मागणी कंगनाने या याचिकेतून केली आहे. अद्याप ही याचिका स्वीकारण्यात आलेली नाही.
कंगना आणि तिची बहिण रंगोली या दोघांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात ट्वीट केलं होतं. यापैकी एका ट्विटवर आक्षेप घेत साहिल नावाच्या एका व्यक्तीने वांद्रे न्यायालयात कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने कंगनाविरोधात राजद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणं या कलमांखाली गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, वांद्रे पोलिसांनी कंगना आणि तिच्या बहिणीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात त्यांची चौकशीही झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kangana ranaut, सुप्रीम कोर्ट