मुंबई, 21 मार्च : सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी चर्चेत आलेली व्यक्ती म्हणजे त्याची मॅनेजर दिशा सालियन. सुशांत सिंह राजपूत वांद्रेत तर दिशा सालियन मालाडमध्ये राहायची. 8 जून 2020 रोजी दिशा सालियानचा इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला होता. त्याच्या 6 दिवसांनंतर म्हणजे 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करत जीवन संपवलं. दिशा सालियनने सुशांत सिंग राजपूतसोबत दीर्घकाळ काम केले होते. त्यामुळे या दोघांचा हा मृत्यू सगळ्यांसाठीच धक्कादायक ठरला होता. आता तिच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनंतर तिचा माजी प्रियकर रोहन राय लग्न करणार आहे अशी माहिती समोर आली आहे.
दिशा सालियनचा माजी प्रियकर अभिनेता रोहन राय त्याच्या ‘पिया अलबेला’ या मालिकेतील सहकलाकार शीन दास हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. या दोघांचं लग्न 22 एप्रिल रोजी काश्मिरमध्ये मोजक्या कुटुंबीयांच्या आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. रोहन आणि शीनच्या लग्नाच्या एक दिवस आधी हळद आणि मेहंदीचा कार्यक्रम पार पडणार आहे. अभिनेत्री शीन दासच्या कुटुंबीयांना काश्मीर आवडते म्हणून दोघांनी काश्मीरमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. जवळपास दोन वर्षांपूर्वी रोहनची एक्स गर्लफ्रेंड दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. दिशाने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मॅनेजरचंही काम केलं होतं.
रोहन राय आणि शीन दास यांची 'पिया अलबेला'च्या सेटवर मैत्री झाली. दिशा सालियनच्या मृत्यूनंतर रोहन राय शीन दासच्या जवळ आला. रोहन रायने एका मुलाखतीत सांगितले की, दिशा सालियनच्या मृत्यूनंतर त्यांना मीडियाच्या अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले, त्यामुळे मी खचलो होतो. त्यावेळी शीनने त्याला साथ दिली. रोहन राय दिशासाठी म्हणाला, 'तिला विसरणं कठीण आहे. मी नवीन नातं सुरु करत आहे यावर माझा अजूनही विश्वास नाही. माझ्या अडचणीच्या काळात शीनने मला साथ दिली होती.' असं तो म्हणाला.
View this post on Instagram
रोहन राय दिशा सालियनच्या आईच्या खूप जवळ आहे आणि त्याने तिच्या कुटुंबाची काळजी घेण्याचे वचन दिले आहे. या लग्नाविषयी प्रतिक्रिया देताना शीन म्हणाली, 'जे घडलं ते खूप दुर्दैवी होतं. आम्ही जेव्हा बोलायला लागलो, तेव्हा त्याला अशा परिस्थितीत पाहून मला खूप वाईट वाटायचं. एक मैत्रीण म्हणून मला त्याची काळजी होती. आता आम्ही लग्न करत असल्याने मी प्रत्येकाला हे म्हणू शकते की मी माझ्या मित्राशी लग्न करतेय. एके दिवशी जेव्हा त्याला सांगितलं की मी लग्नाबाबत गंभीरपणे विचार करतेय आणि त्यानेही विचार करावा. तेव्हा त्याने मला विचारलं की, आपण एकमेकांना समजून घेण्यासाठी वर्षभर वेळ देऊया का? आमच्या नात्यातील सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे, आमचे विचार खूप जुळतात.'
तसेच 'दिशाला रिप्लेस करण्याचा माझा हेतू नसून तिच्या आयुष्यात माझी जागा निर्माण करण्याचा आहे.' असंही ती म्हणाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.