मुंबई, 5 जून- प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले.वयाच्या 94 वर्षी सुलोचना दीदी यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळ आणि श्वसनाचे आजार यामुळे त्यांचे दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सोमवार 5 जून रोजी त्यांच्या पार्थिवावर 5.30 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.अंत्यसंस्काराच्यावेळी मराठी, हिंदी मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. सुलोचना दीदी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या प्रभादेवी येथील राहत्या घरी ठेवण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री आणि अनेक दिग्गजांनी सुलोचना दीदींचं अखेरचं दर्शन घेतलं. सुलोचना दीदी यांच्या निधनाची वार्ता समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.त्यानंतर ते दिल्ली दौऱ्याहून परतत थेट प्रभादेवी येथील सुलोचना दीदींच्या घरी गेले. यावेळी त्यांनी दीदींच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना मानसिक धीर दिला. वाचा- सुलोचना दीदींच्या जाण्याने खचले धर्मेंद्र; पोस्ट करत म्हणाले ‘तुम्ही माझी आई…’ असा आहे सुलोचना दीदींचा प्रवास मराठी मातीतील शालीनता, घरंदाज अभिनय आणि सोज्वळतेचा चेहरा म्हणजे सुलोचना दीदी होय. सुलोचना दीदींचं मूळ नाव सुलोचना लाटकर. कोल्हापूरमधल्या खडकलाट गावी सुलोचना दीदींचा जन्म झाला. 250 हून अधिक मराठी आणि 150 हून अधिक हिंदी सिनेमांमध्ये दीदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. तंबुतल्या चित्रपटाने सुलोचना दीदींना चित्रपटांची ओढ निर्माण केली. पण त्यांचं खरं शिक्षण झालं ते गुरु भालजी पेंढारकरांच्या मार्गदर्शनाखाली. जय भवानी या सिनेमातून सुलोचना दीदी नायिका म्हणून समोर आल्या. मराठा तितुका मेळवावा या सिनेमातल्या जीजाऊंच्या भूमिकेमुळे सुलोचना दीदींचं वेगळं रुप समोर आलं. त्याशिवाय वहिनीच्या बांगड्या, भाऊबीज, बाळा जोजो रे, चिमणी पाखरं, प्रपंच, स्त्री जन्मा तुझी ही कहाणी, पारिजातक हे दीदींचे तुफान गाजलेले चित्रपट. मोलकरीण आणि एकटी या सिनेमात दीदींनी साकारलेली सोशिक आईची भूमिका म्हणजे केवळ लाजवाब..
मराठीप्रमाणेच हिंदी पडदाही सुलोचना दीदींनी गाजवला मराठीप्रमाणेच हिंदी पडदाही सुलोचना दीदींनी गाजवला. बिमल रॉय यांच्या सुजाता चित्रपटात त्यांनी साकारलेली संवेदनशील आईची भूमिका बरीच गाजली. हिंदी चित्रपटांमध्ये त्या पडद्यावर अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेंद्र कुमार, शशी कपूर या आघाडीच्या नायकांच्या त्या आई झाल्या. सुलोचना दीदींना पद्मश्री, महाराष्ट्र भूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

)







