शीखा धारिवाल/ मुंबई, 30 एप्रिल : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. आज मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सध्या कोरोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊन असल्याने त्यांची मुलगी रिद्धिमा दिल्लीत अडकून पडली आहे. तिने सरकारने मुंबईला जाण्याची परवानगी मागितली होती. सरकारने आधी रस्ते मार्गाने जाण्यास परवानगी दिली होती. मात्र रस्ते मार्गाने दिल्लीहून मुंबईला पोहोचण्यास 12 ते 24 तासांचा अवधी लागू शकतो. कर्करोगाचे रुग्ण असल्याने ऋषी कपूर यांचं पार्थिव जास्त कालावधीसाठी ठेवता येऊ शकत नाही. त्यामुळे रिद्धिमा प्रायव्हेट जेटने मुंबईत पोहोचणार आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत ती मुंबईला पोहोचण्याची शक्यता आहे.
दरम्यान रिद्धिमाने इन्स्टांग्रामवर बाबांच्या आठवणीत काही भावना व्यक्त केल्या आहेत. तिने ऋषी कपूर यांच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. यावर ती लिहिते, ' बाबा मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि कायम करीत राहीन. माझ्या मजबूत योद्ध्याच्या आत्मास शांती लाभो. मला तुमची रोज आठवण येईल. मला तुमचे फेस टाइम कॉल्स नेहमी आठवतील. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे बाबा.' रिद्धिमा आल्यानंतरच ऋषी कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ऋषी कपूर जितके चित्रपटांसाठी प्रसिद्ध होते तितकेच ते सामाजिक व राजकीय विषयांवरही आपली मतं न घाबरता मांडत असे. सोशल मीडियावर ते विविध विषयांवर आपलं मत व्यक्त करीत होते. त्यांनी घेतलेल्या एग्झिटमुळे त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
संबंधित - बाबा तुम्ही माझे योद्धा आहात, ऋषी कपूरांच्या लेकीने व्यक्त केल्या भावना
घरी नेणार नाही ऋषी कपूरांचं पार्थिव, दिल्लीत अडकलेल्या लाडक्या लेकीची प्रतीक्षा