मुंबई, 15 फेब्रुवारी : अण्णा नाईक (Anna Nike) हे छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तिरेखांपैकी एक म्हणून ओळखलं जातात. व्यक्त होण्याची अनोखी शैली आणि धडकी भरवणारा कोंकणी आवाज याच्या जोरावर अण्णा नाईकांनी संपूर्ण महाराष्ट्राला अवाक् केलं. खर तर हे पात्र खलनायकी आहे. परंतु अभिनेते माधव अभ्यंकर यांच्या जबरदस्त अभिनयामुळं ‘रात्रीस खेळ चाले’ (Ratris Khel Chale) या मालिकेनं लोकप्रियतेचं शिखर गाठलं. आता या मालिकेचा तीसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. परिणामी अण्णांचा दरारा पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. झी मराठी वाहिनीनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन अण्णा नाईक परत येणार, लवकरच…! अशी घोषणा केली. सोबतच त्यांनी अण्णांचा एक मोशन पोस्टर देखील शेअर केला आहे. या पार्श्वभूमीवर रात्रीस खेळ चाले या थ्रिलर मालिकेचा तीसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं सिद्ध होतं.
अवश्य पाहा - पेट्रोलच्या दरानं गाठलं शतक; संतापलेल्या रिचानं साधला मोदी समर्थकांवर निशाणा गूढ कथा, खुनाचा थरार आणि अतृप्त आत्मांचा वावर अशा प्रकारच्या घटनांनी रात्रीस खेळ चाले या मालिकेनं आपला एक वेगळाच प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता. या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात नाईक कुटुंबीयांचा इतिहास दाखवण्यात आला होता. दत्ता, सुषमा, अभिराम, छाया, पांडू ही मंडळी इतकी विक्षिप्तपणे का वागतात? याची उत्तर प्रेक्षकांना मिळाली. शिवाय अण्णा आणि शेवंताच्या लव्ह स्टोरीमुळं ही मालिका तुफान चर्चेत होती. परंतु मालिकेच्या शेवटच्या भागात अण्णा आणि शेवंताचा मृत्यू दाखवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अण्णा पुन्हा एकदा कसे येणार ही उत्कंठा आता प्रेक्षकांना लागली आहे.