मुंबई, 12 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut Latest Update) तिचं सौंदर्य, अभिनय यासाठी जितकी प्रसिद्ध आहे तितकीच, किंबहुना त्यापेक्षा अधिक आपल्या बेधडक वागण्या-बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा तिच्या वादग्रस्त विधानांमुळे ती चर्चेत असते. म्हणूनच तिला 'पंगा गर्ल' म्हटलं जातं. सध्याही तिच्या एका वादग्रस्त विधानामुळे ती वादाच्या कचाट्यात सापडली आहे. अलीकडेच तिनं एका टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमात देशाच्या स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. अनेकांना तिचं हे वक्तव्य अजिबात आवडलेलं नसून, नागरिक नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर तिला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. तिच्या अशा वक्तव्यावरून तिला फैलावर घेणाऱ्यांमध्ये खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांचाही समावेश असून, त्यांनी कंगनाला चांगलंच सुनावलं आहे. त्यावर कंगनानंही उत्तर दिलं असून, वरुण गांधी आणि कंगना यांच्यात सोशल मीडियावर वाकयुद्ध पेटलं आहे.
खासदार वरुण गांधी यांनी एक ट्वीट करून कंगनाचं हे विधान म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी, शहीद मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासह लाखो स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान असल्याचं म्हटलं आहे.
हे वाचा-बिग बींकडे असणाऱ्या या पेंटिंगची काय आहे किंमत, एवढ्या पैशांत मुंबईत खरेदी करता येईल 2BHK
वरुण गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, की 'कधी महात्मा गांधींच्या बलिदानाचा आणि तपस्येचा अपमान, कधी त्यांच्या मारेकऱ्याचा सन्मान आणि आता शहीद मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा अपमान. या विचारसरणीला वेडेपणा म्हणावं की देशद्रोह?'
त्यावर गप्प बसेल ती कंगना कसली. वरुण गांधींचे ट्वीट पाहून संतापलेल्या कंगनानं वरुण गांधी यांच्या ट्वीटला सणसणीत उत्तर दिलं आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर वरुण गांधींच्या ट्वीटसह आपला मुद्दा शेअर करत तिनं म्हटलं आहे, की 'मी 1857च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याचाही स्पष्ट उल्लेख केला होता. तो लढा अयशस्वी ठरला होता, ज्यामुळे ब्रिटिशांचे अत्याचार आणि क्रूरता आणखी वाढली; मात्र तब्बल 100 वर्षांनंतर गांधीजींच्या याचिकेवर आपल्याला भीक म्हणून स्वातंत्र्य मिळालं. जा आणि आता आणखी रडा!'
कंगना रणौतनं अलीकडेच एका टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमात बोलताना अत्यंत धाडसी विधान केलं होतं. 'सावरकर, राणी लक्ष्मीबाई आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल बोलायचं झालं, तर देशासाठी रक्त वाहावं लागणार याची त्यांना खात्री होती; पण हिंदुस्थानी लोकांनीच हिंदुस्थानी लोकांचं रक्त सांडू नये. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत मोजली; पण नंतर मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं, ती भीक होती. आपल्याला खरं स्वातंत्र्य मिळालं आहे 2014 मध्ये,' असं वक्तव्य तिनं केलं होतं.
त्यावरून देशभरात गदारोळ माजला असून, कंगनाच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे (Complaint Against Kangana Ranaut in Mumbai Police) तक्रारही दाखल करण्यात आली आहे. आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा प्रीती मेनन यांनी ही तक्रार केली आहे. अभिनेत्री कंगना राणावतनं केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा आम आदमी पार्टीनं निषेध केला असून, कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे. कंगनाच्या या देशद्रोही आणि प्रक्षोभक विधानांसाठी तिच्यावर कलम 504, 505 आणि 124अ अंतर्गत कारवाई करण्याची विनंती करणारा अर्ज मेनन यांनी मुंबई पोलिसांना दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Kangana ranaut