मुंबई, 2 मार्च- ‘आई कुठे काय करते’ मालिकेत सध्या अरुंधती-आशुतोषच्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे. या दोघांच्या लग्नात सतत अनेक अडचणी येत आहेत. दररोज नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. या दोघांचं लग्न थांबवण्यासाठी अनिरुद्ध आपले डाव खेळत आहे. मात्र प्रत्येक अडचणींवर यशस्वी मात करत, अरुंधती आणि आशुतोष आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाकडे एक-एक पाऊल टाकत आहेत. दरम्यान मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये अरुंधती-आशुतोषसोबतच यश-गौरी, आणि इशाचासुद्धा रोमँटिक सीन पाहायला मिळत आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षक प्रचंड उत्सुक झाले आहेत. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका तरुण महिलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांचीच आवडती बनली आहे. मालिकेत दररोज काही ना काही रंजक घडामोडी घडतच असतात. त्यामुळेच मालिका टीआरपीच्या शर्यतीत सतत पुढे असते. ही मालिका अरुंधती अर्थातच आईचं आयुष्य, तिच्या जबाबदाऱ्या आणि त्याग या गोष्टींभोवती फिरणारी आहे. तरीसुद्धा मालिकेतील प्रत्येक पात्रांना आपलं एक वेगळं महत्व आहे. मुख्य कलाकारांप्रमाणेच या कलाकारांचासुद्धा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे मालिकेत घडणारी प्रत्येक घडामोड प्रेक्षकांना खिळवून ठेवते. (हे वाचा: Sumeet Bhokse: ‘मुरांबा’ फेम अभिनेता लवकरच बांधणार लग्नगाठ; दणक्यात पार पडला साखरपुडा ) दरम्यान मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सर्व जोडप्यांवर प्रेमाचा रंग चढलेला दिसून येत आहे. अरुंधती आशुतोषपासून ते गौरी-यशपर्यंत सर्वजण एकमेकांच्या प्रेमात हरवून गेले आहेत.अरुंधती आणि आशुतोष एका कॅफेत बसलेले दिसून येत आहेत. तर ईशा आणि अनिश एका गार्डनमध्ये बसलेले दिसून येत आहेत. तर दुसरीकडे गौरी आणि यश घरामध्ये दिसून येत आहेत. हे तिन्ही कलाकार आपल्या लेडी लव्हला आयुष्यभर प्रत्येक अडचणीत खंबीर साथ देण्याचं वचन देत आहेत.
मालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे. सोबतच मालिकेत सतत अडचणी येत आहेत. अनिरुद्धकडून अनेक कटकारस्थने केली जात आहेत. अशातच हा नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांना थोडासा दिलासा मिळाला असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. या तिन्ही जोडप्यांचा रोमान्स पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
खास अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नासाठी मालिकेत गौरीची वापसी झाली आहे. त्यामुळे सर्वच प्रचंड आनंदात आहेत. परंतु गौरी फक्त लग्नासाठी परतली आहे, आणि पुन्हा परदेशी जाणार आहे समजल्यानंतर यश नाराज झाला आहे. यश आता मालिकेत गौरीचं मन वळवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.