जयपूर, 30 मे : राजस्थानमधील जयपूरमध्ये सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथे एका विहिरीत तीन महिलांसह दोन मुलांचे मृतदेह (Deadbody) आढळून आले. या तीनही महिला सख्ख्या बहिणी आहेत. त्यांचे लग्न (Marriage) एकाच घरात झाले होते. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. Whatsapp Statusवर दिला आत्महत्येचा इशारा तीनपैकी एका महिलेने यापूर्वीच व्हॉट्सअॅपद्वारे आत्महत्या (Suicide) करण्याचे संकेत दिले होते. पोलिसांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. या महिला मीन परिसरात राहत होत्या. 25 मे रोजी या तीनही बहिणी मुलांसह बाजारात गेल्या असता त्या घरी परतल्याच नाहीत. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. यासोबतच बेपत्ता महिलांचे पोस्टरही लावण्यात आले होते. मात्र, महिलांचे मृतदेह सापडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये काली देवी (वय 27), ममना मीणा (वय 23), कमलेश मीणा (वय 20) यासोबतच हर्षित (वय 4) आणि एका नवजात बालकाचाही समावेश आहे. दोन बहिणी गरोदर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता आणि कमलेश या गरोदर होत्या. या तिघांचेही 2005मध्ये लहान वयात लग्न (Marriage) झाले होते. त्यांचे पती शेती करतात. त्यांच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप महिलांनी केला. लहान बहीण कोणाशी तरी फोनवर बोलत होती, त्यानंतर पती मुकेशने तिला बेदम मारहाण केली. तसेच तिन्ही बहिणींना सासरच्या लोकांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप चुलत भाऊ हमराज मीना यांनी केला आहे. हेही वाचा - धक्कादायक! पत्नी वरातीत नाचल्याने भडकला पती; कुटुबीयांसह मिळून दिला भयंकर मृत्यू
जयपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष अग्रवाल यांनी सांगितले की, पीडितेने तिच्या व्हॉट्सअॅपवर एक स्टेटस शेअर केले होते. यात तिने लिहिले होते की, आमच्या पाच जणांच्या मृत्यूचे कारण सासरचे लोक आहेत, आम्हाला मरायचे नाही. मात्र, आमच्यावर ज्या पद्धतीने अत्याचार केले जात आहेत, त्यापेक्षा मरण बरे. यात आमच्या पालकांचा दोष नाही. मुलींच्या वडिलांनीही सासरच्या लोकांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.