जयपूर 25 मे : लग्नाला एक वर्ष झालं आणि लग्नाच्या पहिल्या वाढदिवशीच (First Wedding Anniversary) बायको ब्यूटी पार्लरला जाण्यासाठी घराबाहेर पडली. मात्र, ती बराच वेळ परत आलीच नाही. यामुळे नवऱ्यानं तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु, ती कुठेच दिसली नाही तेव्हा आपली बायको फरार झाली असल्याची कल्पना त्याला आली. यानंतर लगेचच आग्रा गाठत तो तिच्या माहेरी पोहोचला. मात्र, तिच्या माहेरच्या लोकांना दरजावाही उघडला नाही. त्याची बायको आपल्या माहेरीच पळून (Wife Run Away to Maternal Place) आली होती. तब्बल 31 तास नवरा तिच्या घराबाहेर बसून राहिला. मात्र, शेवटी त्याला रिकाम्या हातीच घरी परतावं लागलं. ही घटना आहे राजस्थानमधील. राजस्थानच्या अजमेरमधील अविनाश वर्मा नावाच्या तरुणाची उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील सुलहकुल नगरमध्ये राहाणाऱ्या एका तरुणीशी एका वर्षापूर्वी विवाह झाला होता. अविनाश हा अकाउण्टंट असून त्याचे वडील सेवानिवृत्त नायब तहसीलदार आहेत. मात्र, चांगली नोकरी असतानाही अविनाश हुंड्यासाठी आपला छळ करत असल्याची तक्रार त्याच्या पत्नीनं महिला आयोगात केली. या प्रकरणाची चौकशी अजमेर पोलिसांकडे सोपवण्यात आली. यानंतर काही दिवसाच अजमेर पोलीस अविनाशच्या घरी पोहोचले. या घटनेनंतर अविनाशच्या आई-वडिलांनी त्याला संपत्तीतून बेदखल केलं. इतकंच नाही तर त्याला आपली नोकरीही गमवावी लागली. कालांतरांनं बायको त्याच्यासोबत फोनवर बोलू लागली, मात्र नांदायला यायला ती तयार होत नव्हती. बायकोचा अंतिम निर्णय जाणून घेण्यासाठी अविनाश गेल्या शनिवारी पुन्हा तिच्या माहेरी गेला. मात्र, अविनाश घरी येताच बायको आपल्या नातेवाईकांच्या घरी निघून गेली. मात्र, अविनाशनंही तिच्या घराच्या बाहेरच ठिय्या दिला. अविनाशला या अवस्थेत पाहून शेजाऱ्यांनाही त्याची दया आली आणि त्यांनी अविनाशची झोपण्याची व्यवस्था करुन दिली. बराच काळ अविनाश बायकोच्या घराबाहेरच बसून राहिला मात्र बायकोनं शेवटपर्यंत त्याला दर्शन दिलं नाही आणि अविनाशला रिकाम्या हातीच घरी परतावं लागलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.