कल्याण, 25 ऑगस्ट : खारी बटर विक्रीच्या वादातून एकाची हत्या झाल्याची घटना कल्याणमधील वालधुनी परिसरात घडली आहे. रोशनलाल कनोजिया (45) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी तिघांना कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनीअटक केली आहे.
कल्याणमधील वालधुनी इथं राहणारा अमर बहादूर विपत कनोजिया याचा कपडे इस्त्री करण्याचा व्यवसाय होता. मात्र लॉकडाउनमध्ये इस्त्रीचा व्यवसाय बंद पडल्याने अमर कनोजिया याने खारी, बटर टोस्ट, पाव विकण्याचा व्यवसाय सुरू केला. जून महिन्यात अमर याचे त्याच्या शेजारी राहणाऱ्या आणि पाव विक्री करणाऱ्या सलाउद्दीन अन्सारी, काशीबुद्दिन अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी यांच्यात पार्किंगच्या कारणावरून वाद झाला होता. अमरने खारी, टोस्ट, पाव विक्रीचा व्यवसाय सुरू केल्याने सलाउद्दीन अन्सारी याच्याकडील ग्राहक अमरकडे जाऊ लागले होते, याचा देखील राग त्यांच्या मनात होता.
मेट्रो, विमानं, सिनेमागृह, शाळा? दिवाळीपर्यंत 'ही' ठिकाणं खुली होण्याची शक्यता
आज सकाळी देखील अमर कनोजिया आणि सलाउद्दीन यांच्यात असाच वाद सुरू असतांना सलाउद्दीन अन्सारी, काशीबुद्दीन अन्सारी यांनी अमर याला शिवीगाळ, दमदाटी करून त्याच्या छातीवर पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी अमर याचे भाऊ रोशनलाल कनोजिया हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना देखील छातीवर, पोटावर व शरीरावर लाथाबुक्क्यांनी जोर जोराने मारहाण केली. यामुळे रोशनलाल खाली पडले असता, त्यांना रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मयत झाल्याचे घोषित केले.
याप्रकरणी अमर कनोजिया याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी सलाउद्दीन अन्सारी (25), काशीबुद्दिन अन्सारी (28) आणि मोहम्मद अन्सारी (20) या तिघांना महात्मा फुले पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती एसीपी अनिल पोवार यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.