विजय वंजारा, प्रतिनिधी मुंबई, 13 जून : अनेकांना घर देण्याचे खोटे आश्वासन देऊन कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या विष्णू महिपत जाधव या आरोपीला मुंबईतील शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली आहे. दादर परिसरात कार्यरत असलेल्या विष्णू जाधवने काही दलालांसोबत हातमिळवणी करून लोकांना फसवल्याचे उघड झाली आहे. पीडितांनी दाखल केलेल्या तत्काळ तक्रारींनंतर, गुन्हा नोंदवण्यात आला. ज्यामुळे 9 जूनला आरोपी विष्णू जाधव याला अटक करण्यात आली. काय आहे प्रकरण? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णू जाधव (वय 65) याला अशाच आरोपाखाली दुसऱ्यांदा अटक करण्यात आली आहे. विष्णू जाधव हे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यासमोरील नवलकर इमारतीचे मालक आहेत. नवलकर इमारतीचा पुनर्विकास करण्याचे आश्वासन देऊन फसवणूक करून कोट्यवधी रुपये उकळले. 2018 मध्ये, त्यांनी पुनर्विकासाचे खोटे आश्वासन देऊन लोकांकडून 2 कोटी 34 लाख 68 हजार इतकी रक्कम गोळा केली. त्यावेळी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी त्याला जामीन मिळाला आणि त्याची सुटका झाली. वाचा - ‘सरस्वतीची हत्या मी नाही तर..’ मनोजच्या कबुलीमुळे पोलिसांचाही गोंधळ! दुसऱ्यांदा पुन्हा तोच गुन्हा, फक्त पद्धत वेगळी बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा खोटी आश्वासने देऊन लोकांकडून पैसे गोळा केले. फक्त यावेळी पद्धत वेगळी वापरली. पीडितांनी त्याच्याकडे रोख रक्कम आणि धनादेश सुपूर्द केले, त्यानंतर त्याने पावत्या आणि सामंजस्य कराराची कागदपत्रे दिली. मात्र, वचन दिल्याप्रमाणे फ्लॅट वितरित करण्यात किंवा नवलकर इमारतीचा पुनर्विकास करण्यात त्यांना अपयश आले. 9 जून रोजी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात पीडितांची 2 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भादंवि कलम 420, 406 आणि 409 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
अनेक दिवसांपासून फरार असलेल्या विष्णू जाधवला जेरबंद करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. न्यायालयाने त्याला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्याने फसवणूक केलेल्या लोकांनी त्याच्याकडे जाऊ नये म्हणून तो वारंवार आपले निवासस्थान बदलतो. दादरमधील अनेक लोकांची त्याच्याकडून फसवणूक झाली आहे. आता आणखी पीडित पोलीस ठाण्यात येत आहेत. पोलिसांनी लोकांना विष्णू जाधव आणि त्याच्या दलालांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.