नवी दिल्ली 13 जानेवारी : दिल्लीतील कंझावला प्रकरणाचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. दिल्लीच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी शालिनी सिंह यांच्या अहवालानंतर गृह मंत्रालयाने पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचं गांभीर्य आणि उपलब्ध पुराव्याच्या आधारे कंझावला प्रकरणातील आरोपींवर कलम 302 म्हणजेच हत्येचं कलम लावून या प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार दिल्ली पोलिसांनी यासंदर्भात एक अहवाल तयार केला होता. अहवाल प्राप्त झाल्यानंतर गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिसांना हे महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. एमएचएने पोलीस पिकेट आणि पीसीआरमध्ये उपस्थित असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे.
अंजली गाडीखाली अडकल्याचं माहिती होतं? कंझावाला प्रकरणात आरोपींचा आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा
मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आलं आहे की, घटना घडली त्यावेळी तेथील डीसीपींनी कायदा आणि सुव्यवस्थेसाठी काय व्यवस्था केल्या होत्या हे स्पष्ट करावं. योग्य उत्तर न मिळाल्यास त्यांच्यावरही कारवाई करावी. अन्य एका सूचनेमध्ये असं म्हटलं आहे की, गुन्हेगारी स्थळाच्या आजूबाजूच्या भागात पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करण्यात यावी.
दिल्लीच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी शालिनी सिंह यांच्या अहवालानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्ली पोलीस आयुक्तांना हे निर्देश दिले आहेत. गृह मंत्रालयाने संबंधित विभागाला दिल्लीच्या निर्जन भागात आणि बाहेरील दिल्लीच्या अनेक भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सांगितलं आहे.
या प्रकरणानंतर गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसार गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिसांकडून अहवाल मागवला होता. गृह मंत्रालयाच्या या आदेशानंतर दिल्ली पोलिसांनी वरिष्ठ अधिकारी शालिनी सिंह यांना यासंदर्भात अहवाल तयार करण्यास सांगितले होते. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर गृह मंत्रालयाने हे महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.
कंझावाला अपघात प्रकरण : सातवा आरोपी पोलीस ठाण्यात पोहोचला, स्वतःच केलं सरेंडर
अंजलीचा 1 जानेवारी रोजी दिल्लीतील कंझावला येथे मृत्यू झाला होता. तिचा मृतदेह दिल्लीच्या रस्त्यावर 12 किलोमीटरपर्यंत फरफटत नेण्यात आला. संपूर्ण देश नववर्ष साजरा करत असताना रात्री हा सर्व प्रकार घडला होता. दिल्ली पोलिसांच्या कडक बंदोबस्ताच्या दाव्यात अंजलीचा रस्त्यातवरच मृत्यू झाला होता.
कंझावला येथे 1 जानेवारीला पहाटे एका प्रवाशाने एक मृतदेह कारसोबत फरफटत जात असल्याचं पाहिलं. त्यानंतर साडेतीनच्या सुमारास त्यांनी पोलिसांना फोन केला. दीपक नावाच्या तरुणाने सांगितलं की, पहाटे 3.15 वाजेच्या सुमारास मी दूध वितरणाची वाट पाहत असताना एक कार येताना दिसली. मागच्या चाकांमधून मोठा आवाज येत होता. यानंतर त्यांनी गाडीच्या मागे लटकलेल्या मृतदेहाची माहिती पोलिसांना दिली. पहाटे ५ वाजेपर्यंत पोलिसांच्या संपर्कात राहिल्याचे दीपकने सांगितले. मात्र, कोणीही घटनास्थळी आले नाही. त्याने बेगमपूरपर्यंत गाडीचा पाठलाग केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Delhi