बीड, 21 डिसेंबर : बीडच्या (Beed) रोहितळ येथे एका गावगुंडाने मध्यरात्री एका घरावर हल्ला केला. सुदैवाने घरात कुणी नव्हतं. आरोपीने घरावर रॉकेल (Kerosene) टाकून घरातील सर्व संसार जाळून (Burned) खाक केला. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीचं घर होतं त्याच्या भावासमोर हा सर्व प्रकार घडला. पीडित व्यक्तीचा भाऊ त्या गावगुंडाकडे तसं न करण्यासाठी याचना करत होता. त्याच्या पाया पडत होता. पण आरोपीने त्याची बाजू ऐकून घेतली नाही. याउलट त्याला आणि त्याच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी (Death threats) दिली. त्यामुळे हतबल असलेला भाऊ डबडबलेल्या डोळ्यांनी आपल्या सख्ख्या भावाचा संसार जळताना बघत उभा राहिला.
नेमकं प्रकरण काय?
संबंधित घटना ही दोन दिवसांपूर्वी गेवराई तालुक्यातील रोहितळ गावात घडली आहे. गावात राहणारे मच्छिंद्र राऊत यांचे सलूनचे दुकान आहे. ते गावातच पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. गावातील पवन जगन्नाथ खाडे याच्यासोबत त्यांचं किरकोळ भांडण झालं होतं. या दरम्यान मच्छिंद्र राऊत काही कामानिमित्ताने बाहेरगावी गेले होते. दुसरीकडे पवन खाडे या नराधमाला भांडणाचा सूड घ्यायचा होता. त्याने भांडणाचा राग मनात ठेवून पहाटे तीन वाजता मच्छिंद्र यांच्या घरावर हल्ला केला. त्याने दरवाजातून घरात पेट्रोल ओतले. त्यानंतर संपूर्ण घराला आग लावून दिली.
हेही वाचा : SSC HSC Exams 2022: 10वी, 12वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, पाहा संपूर्ण Timetable
आरोपीकडून जीवे मारण्याची धमकी
आरोपी पवन खाडे याच्या ओरडण्याचा आणि हैदोसाचा आवाज ऐकून मच्छिंद्र राऊत यांचे मोठे भाऊ गोरख राऊत तिथे आले. त्यांनी आरोपी पवनला अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी पवनचे पाय पडत तसं न करण्याची विनंती केली. पण आरोपीने कोणतीही दया दाखवली नाही. याउलट त्याने गोरख यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच "तुझे मुले आणि मुलगी रोज शाळेत ये-जा करतात. त्यांच्यासोबत मी काहीही करेन", अशी धमकी दिली. अखेर हतबल झालेले गोरख यांच्या डोळ्यांसमोर नराधमाने त्यांच्या लहान भावाचा संस्कार जाळून खाक केला.
मच्छिंद्र यांच्या पत्नीचा आक्रोश
संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर मच्छिंद्र राऊत आपल्या कुटुंबासह आपल्या राहत्या घरी दाखल झाले. आपला संसार जळून खाक झालेला पाहिल्यानंतर मच्छिंद्र यांच्या पत्नी गीता राऊत यांनी टाहो फोडला. घरातील सर्व साहित्य नराधमांनी जाळून टाकलं. आता माझ्या लेकरांना खायला काय घालू, असं म्हणत गीता यांनी आक्रोश केला. दुसरीकडे मच्छिंद्र यांचे भाऊ गोरख यांनाही आरोपीने मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याने ते देखील दहशतीत होते.
हेही वाचा : अतिविश्वास नडला, औरंगाबादमधील दोघांनी लेन्सकार्ट कंपनीला लावला 93 लाखांचा चुना
अखेर गावगुंडाला बेड्या
अखेर या सगळ्या प्रकरण राऊत कुटुंबाने पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार केली. संबंधित तक्रारीनंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळख आरोपी पवन खाडेला पकडण्यासाठी एक पथक तैनात केलं. अखेर पोलिसांनी आरोपी पवन खाडे याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरु आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news