अखिलेश कुमार, प्रतिनिधी बहराइच, 2 जुलै : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या तसेच आत्महत्येच्याही घटना घडत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये एका प्रेमकथेचा वेदनादायक अंत झाला आहे. प्रियकराला नोकरीसाठी सौदी अरेबियाला जायचे होते. एक दिवस आधी मुलीच्या वडिलांची समजूत काढण्यासाठी गावात पंचायतही झाली होती. मात्र, मुलीच्या घरच्यांचा या प्रेमसंबंधांना विरोध होता. मुलीच्या प्रेमप्रकरणाचा राग आल्याने वडिलाने प्रियकराला घरी बोलावून त्याची हत्या केली. तसेच नंतर मृतदेह लटकवला. ही धक्कादायक घटना हेमरिया गावात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गावात राहणाऱ्या इक्बालचे गावातीलच मुलीसोबत अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. मात्र, मुलीचे वडिलाचा या प्रेमसंबंधांना विरोध होता. मुलीच्या वडिलांची समजूत काढण्यासाठी शुक्रवारी गावात पंचायतही झाली होती. मात्र, त्यात काही निष्पन्न झाले नाही. प्रेयसीचा फोन आणि वडिलांची एंट्री - प्रेयसीने शुक्रवारी रात्री प्रियकर इक्बालला घरी बोलावले. दोघांची भेट सुरू असताना मुलीचे वडील तेथे आले. दोघांना एकत्र पाहून वडिलांना राग आला. या रागातूनच त्याने इक्बालला आधी बेदम मारहाण केली आणि नंतर मुलीच्या स्कार्फला फास लावून त्याला फाशी दिली. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी भुस्सी आपल्या परिवारासह फरार आहे. आरोपी भुस्सी याची प्रतिमा गावात चांगली नाही. त्याच्या याआधीही अनेक गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलीस आता कसुन तपास करत आहेत.