मुंबई 17 मे : कष्ट आणि चिकाटी या दोन गोष्टींमुळे माणूस जीवनात प्रचंड मोठं यश साध्य करू शकतो आणि स्वतःला कुठल्या कुठे नेऊन ठेवू शकतो. हे वाक्य आपण किती तरी ठिकाणी वाचलं असेल. जीवनात यश मिळवलेल्या बहुतांश व्यक्तींनी ते अमलात आणलेलं असतं. असंच एक प्रेरक उदाहरण नुकतंच समोर आलं आहे. मुंबईतल्या झोपडपट्टीत जन्मलेली आणि रोजच्या उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर फुलं विकणाऱ्या एका मुलीला आता कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीत (University of California) पीएचडीसाठी (PhD) प्रवेश मिळाला आहे. आयुष्याची वाटचाल करताना सर्व प्रकारचे धक्के खाऊन जिद्दीने संकटाच्या उरावर पाय देऊन उभं राहिलेल्या या मुलीची कामगिरी अत्यंत प्रेरक आहे. सरिता माली (Sarita Mali) असं या मुलीचं नाव. 'एबीपी लाइव्ह'ने या मुलीबद्दलचं वृत्त दिलं आहे.
सरिताचं कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशातल्या (UP) जौनपूरचं. पोटापाण्यासाठी सरिताचे वडील मुंबईत येऊन पोहोचले आणि रस्त्यावर फुलं विकण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. मुंबईच्या झोपडपट्टीत (Mumbai Slum) हे कुटुंब राहायचं. तिथेच सरिताचा जन्म झाला. सरिताला कळायला लागलं, तेव्हापासून तिने आपल्या आजूबाजूला फक्त फुलंच पाहिली आहेत. तिच्या जीवनाचा रस्ता मात्र काट्या-कुट्यांनी भरलेला होता. कारण आर्थिक परिस्थिती. सरिताच्या कुटुंबात तिचे आई-वडील, मोठी बहीण आणि दोन छोटो भाऊ असे एकूण सहा जण. त्यातले कमावणारे फक्त तिचे वडील. त्यामुळे साहजिकच या चक्रातून बाहेर पडण्यावर मर्यादा होत्या. यातून बाहेर पडायचं तर शिक्षण हवं आणि त्यासाठी पैसे हवेत आणि त्यासाठी काम करण्याला पर्याय नाही; पण तिच्या कुटुंबाने तिला साथ दिली आणि तिने जिद्दीने, कष्टाने त्या संधीचं सोनं केलं.
UPSC Tips: IAS मुलाखतीदरम्यान 'या' अक्षम्य चुकांमुळे स्वप्न राहील अधुरं; आताच अशी घ्या काळजी
मुंबई महापालिकेच्या शाळेतून तिने प्राथमिक शिक्षण घेतलं. चांगलं यश मिळवत गेल्यामुळे तिने दिल्लीतल्या जेएनयूपर्यंत झेप घेतली. तिथून तिने एमए आणि एमफिल या पदव्या प्राप्त केल्या. सध्या ती तिथल्या भारतीय भाषा केंद्रात हिंदी साहित्य या विषयात पीएचडी करत आहे. आता तिला युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये पीएचडीसाठी प्रवेश मिळाला आहे.
सरिता आपल्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करायची. सण-उत्सवांच्या काळात ती वडिलांसोबत फुलं विकायला जायची. विशेषतः गणेश चतुर्थी, दिवाळी अशा सणांच्या काळात तर ती हमखास या कामात सहभाग घेऊन आपल्या वडिलांचे कष्ट कमी करण्याचा प्रयत्न करायची. अर्थातच, ती शाळा सांभाळून हे करायची. एवढंच कशाला, अगदी जेएनयूत शिकायला आल्यानंतरही सुट्टीच्या काळात ती घरी जायची, तेव्हा फुलांच्या माळा बनवायची.
गेली दोन वर्षं कोरोना महामारीच्या काळात तिच्या वडिलांचं काम थांबलं होतं. तेव्हा लॉकडाउन असल्यामुळे तिचे वडील उत्तर प्रदेशातल्या जौनपूरमधल्या बदलापूर इथल्या आपल्या मूळ घरी गेले होते.
नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी इंजिनिअर तरुणाने सुरू केलं विणकाम; आता अनेकांसाठी ठरला प्रेरणा
सरिता म्हणते, 'चढ-उतार प्रत्येकाच्याच जीवनात येतात. प्रत्येकाची स्वतःची अशी संघर्षाची कहाणी असते, प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या असतात. तुम्ही कोणत्या समाजात जन्मता, त्यावर तुमच्या आयुष्यात काय असणार हे अवलंबून असतं. दुर्भाग्याने म्हणा किंवा सौभाग्याने म्हणा, मी अशा समाजात जन्मले, की जिथे समस्या हाच माझ्या जीवनाचा सर्वांत महत्त्वाचा घटक होता. माझ्या कुटुंबाचे कष्ट आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी आज इथपर्यंत येऊन पोहोचले आहे.'
वाट काट्यांनी भरलेली असली, तरी कष्टांची सरिता प्रवाहित केली, तर वाटेवरच्या काट्यांची फुलंच होतात, हे सरिता मालीच्या उदाहरणावरून स्पष्ट होतं...!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Positive story