मुंबई 29 जुलै : सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अखेर राज्यातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला आहे. यंदाच्या मुंबईतील अकरावीच्या (FYJC) सर्वसाधारण गुणवत्ता यादींमध्ये कट-ऑफची (FYJC Cut-off) टक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही शाळांच्या पहिल्या गुणवत्ता याद्या जाहीर झाल्या असून, त्यामध्ये अल्पसंख्याक कोट्याचे कट-ऑफ हे गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढल्याचं समोर आलं आहे. जनरल कॅटेगरीमध्ये (FYJC general category cut-off) देखील तशीच परिस्थिती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
यंदा दहावीला 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी दिसून आली. गेल्या वर्षी असे सुमारे एक लाख विद्यार्थी होते, तर या वर्षी केवळ 83,060 विद्यार्थ्यांना हा टप्पा गाठता आला. 100 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही 122 होती.
कोणत्या कॉलेजमध्ये किती कट-ऑफ
मुंबईतील सेंट झेवियर्स (St. Xavier’s FYJC cut-off) आणि सेंट अँड्र्यूज (St. Andrew’s FYJC cut-off) या कॉलेजच्या पहिल्या याद्या जाहीर झाल्या असून, त्यामध्ये अल्पसंख्याक कोट्याचे कट-ऑफ हे गेल्या वर्षीच्या तुलनेत 2-6 टक्क्यांनी वाढले आहेत, किंवा 2020 च्या स्तरावर गेले आहेत. गेल्या वर्षी चांगला निकाल लागला असूनही अल्पसंख्याक यादीतील कट-ऑफ कमी झाला होता. सेंट झेवियर्समध्ये ख्रिश्चन अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी कला शाखेचा कटऑफ 83.6 टक्के आहे. गेल्या वर्षी हा 83.4 टक्के होता. तर विज्ञान शाखेचा कटऑफ हा 78.8 टक्के आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत चार टक्क्यांनी वाढला आहे. सेंट अँड्र्यूज कॉलेजमध्ये विज्ञान शाखेचा कट ऑफ हा 80.6 टक्के आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 6 टक्क्यांनी अधिक आहे. तर या कॉलेजमध्ये कला शाखेचा कट-ऑफदेखील गेल्या वर्षीच्या तुलनेत 3 टक्क्यांनी अधिक आहे. सिंधी अल्पसंख्याक असलेले एचआर (HR College FYJC cut-off) आणि हिंद कॉलेज (Hind College) या दोन्ही ठिकाणी पहिली यादी 70 टक्क्यांवर बंद झाली. एचआर कॉलेजमध्ये अल्पसंख्याक कोट्याचा गेल्या वर्षीचा कट-ऑफ 60 टक्के होता. एनएम कॉलेजमध्ये (NM College) गुजराती अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी वाणिज्य शाखेचा कट-ऑफ 91.33 टक्के आहे.
एक लाख जागा शिल्लक
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात येणाऱ्या 487 महाविद्यालयांमध्ये मिळून एकूण 1.4 लाख कोटा सीट्स आहेत. यांपैकी एक लाख या अल्पसंख्याक कोट्यातील (Mumbai Colleges FYJC minority seats) आहेत. अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये अल्पसंख्याक कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी 50 टक्के जागा राखीव आहेत. गुरुवारी (28 जुलै 2022) संध्याकाळपर्यंत अल्पसंख्याक कोट्यातील एकूण 796 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. म्हणजेच, अजूनही हजारो जागांवर प्रवेश बाकी आहे. ज्या विद्यार्थ्यांना राउंड झीरोमध्ये कोटा दिला गेला आहे, ते विद्यार्थी 30 जुलैपर्यंत आपला प्रवेश निश्चित (FYJC admissions) करू शकतात. तसंच, अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशाच्या पुढच्या फेरीसाठी विद्यार्थी अजूनही फॉर्म भरू शकतात.
गेल्या वर्षी बारावीच्या परीक्षा न झाल्यामुळे पदवी महाविद्यालयांमधील कट-ऑफ वाढले होते. या उलट कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये गेल्या वर्षी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत एक ते पाच टक्क्यांची घट झाली होती. आपल्या कॉलेजमध्ये बऱ्याच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज दाखल केल्याचं सेंट झेवियर्सचे मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे यांनी सांगितलं. जनरल लिस्टमध्येही अशाचप्रकारे वाढलेला कट-ऑफ दिसण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. “वाढलेला कट-ऑफ हा या गोष्टीचा संकेत असू शकतो, की विद्यार्थी आता आपल्या पसंतीच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत आहेत. गेल्या वर्षी कोविडमुळे कित्येकांनी आपल्या घराजवळील महाविद्यालयं निवडली होती.” असंही एका मुख्याध्यापकांनी सांगितलं. एकूणच शिक्षण रूळावर येत आहे असं म्हणायला हरकत नाही.
दरम्यान इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२१-२२ मुदतवाढ देण्यात आली आहे, ती पुढीलप्रमाणे
नियमित फेरी - एक, अर्जाचा भाग-२ भरणेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
सन २०२२-२३ मध्ये राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र (MMR) तसेच पुणे, पिंपरीचिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इ. ११वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत नियमित प्रवेश फेरी क्र. १ साठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. त्यानुसार प्रवेश अर्जाचा भाग-१ भरणे तसेच पसंती अर्ज भाग-२ भरणेची मुदत दि.२७/०७/२०२२ रोजी संपलेली आहे. तथापि याबाबत पुढील बाबी निदर्शनास आलेल्या आहेत.
प्रवेश अर्ज भाग-१ भरुन लॉक केलेला आहे परंतु अर्ज प्रमाणित झालेले नाहीत असे विद्यार्थी ६०४१ प्रवेश अर्ज भाग-१ प्रमाणित आहे परंतु भाग-२ भरलेला नाही असे विद्यार्थी ५८८९
अशाप्रकारे सुमारे ११९३० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भाग-२ भरलेले नाहीत. त्यामुळे असे विद्यार्थी प्रवेश फेरी - १ मध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत सबब हे विद्यार्थी प्रवेशाच्या संधीपासून वंचित राहू नये यासाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
१. नियमित प्रवेश फेरी- १ साठी अर्ज करण्यास मुदवाढ.
२. सदर वाढीव कालावधीमध्ये नवीन अर्जाचा भाग - १ भरता येणार नाही. अर्ज भाग-१ शाळा व मार्गदर्शन केंद्र यांनी प्रमाणित करणे | दि. ३०/०७/२०२२ रोजी सायं. ०५:००वा पर्यंत. पसंती अर्ज भाग-२ भरुन लॉक करणे दि.३०/०७/२०२२ रोजी सायं. ०६:००वा पर्यंत.
३. कोटांतर्गत प्रवेश व सर्वसाधारण गुणवत्ता यादी बाबत दुरुस्ती यापूर्वी जाहीर वेळापत्रकानुसार कार्यवाही सुरु राहील. तसेच दि.३०/०७/२०२२ नंतर प्रवेशाबाबत सर्व कार्यवाही यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार सुरु राहील त्यामध्ये कोणाताही बदल केलेला नाही.
४. सर्वसाधारण गुणवत्ता यादी पोर्टलवर विद्यार्थी लॉगीन मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी त्यामध्ये आपले गुण व गुणवत्ता क्रमांक तपासून खात्री करावी. त्याबाबत काही आक्षेप असल्यास Send Grievance द्वारे पुराव्यासह तक्रार नोंदवावी, त्यानुसार संबंधित शिक्षण उपसंचालक यांनी तपासून त्यामध्ये दुरुस्त्या कराव्यात. ही कार्यवाही दिलेल्या मुदतीत पूर्ण करावी.
कोटांतर्गत प्रवेशाबाबत विद्यालय स्तरावरुन प्रवेशासाठी कोटांतर्गत राखीव ठेवलेल्या जागांवरील प्रवेश दिलेल्या वेळापत्रकानुसार विद्यालय स्तरावरुनच करता येतील. त्यासाठी प्रवेशाच्या पोर्टलवरुन कोटांतर्गत प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची नावे विद्यालयांना उपलब्ध केली जातील. कोटांतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पसंती नोंदविणे व त्यामध्ये बदल करणे कार्यवाही निरंतर सुरु राहील. पहिल्या टप्प्यात निवड न झालेले तसेच नवीन पसंती नोंदविलेले विद्यार्थी पुढील टप्प्यासाठी पात्र असतील अशा प्रकारे प्रत्येक प्रवेश फेरीसाठी दिलेल्या वेळेत विद्यालयांना कोटाप्रवेश करता येतील. कोटांतर्गत प्रवेशाबात शासन निर्णय क्र. न्यायाप्र-२०१५/६१/१५/एसडी-२ दि.२८/०३/२०१६ मधील तरतूदीनुसार करण्यात येतील.
६. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे तपासून घेणे व नियमानुसार प्रवेश देणे ही जबाबदारी संबंधित विद्यालयांची असेल.
७. शासन निर्णय क्र प्रवेश - २०१८/प्रक्र. ३३३ / एसडी-२ दि. ०७/०३/२०१९ मधील तरतूदीनुसार इ.११ वी मध्ये प्रवेशित होणाऱ्या शेवटच्या विद्यार्थ्यापर्यत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीनेच होईल.
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)महेश पालकर यांनी कळवले आहे. या संबंधात परिपत्रक शिक्षण विभागाने जारी केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Education, Exam result