नवरदेव झाला फरार (प्रतिकात्मक फोटो)
पाटणा 28 जून : लग्नाचा दिवस हा नवरदेव आणि नवरीसाठी अतिशय खास असतो. मात्र, अनेकजण याच दिवशी असं काही करतात की सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. बिहारच्या छपरा जिल्ह्यातून असंच एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. यात एका तरुणाचं लग्न झालं. तो आपल्या नववधूला खाऊ घालण्यासाठी छान मिठाई खरेदी करण्यासाठी गेला होता. पण रात्र झाली, नवरी वाट पाहत राहिली, मात्र नवरदेव आलाच नाही. तो हुंड्यात मिळालेली दुचाकी घेऊन गायब झाला. रात्रभर नातेवाईक त्याचा शोध घेत होते. यावेळी नातेवाइकांचीही चौकशी करण्यात आली, मात्र नवरदेवाचा पत्ता लागला नाही. काहीतरी अनुचित प्रकार घडल्याची भीती असल्याने कुटुंबीयांनी मंगळवारी स्थानिक पोलीस ठाण्यात अर्ज दाखल करून पोलिसांना त्याचा शोध घेण्याची विनंती केली आहे. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मंदिरात गेलेलं जोडपं; काही लोक आले अन् नवरीलाच घेऊन पळाले, मग.. असं सांगितलं जात आहे, की भोराहा गावातील रहिवासी दिनेश महतो यांचा 24 वर्षीय मुलगा जियालाल याचा 25 जूनच्या रात्री मढ़ौरा पोलीस स्टेशन हद्दीतील नेथुआ गावात राहणारे काशी महतो यांची मुलगी ज्योती कुमारीसोबत विवाह झाला होता. 26 जून रोजी सकाळी जियालालने आपल्या नववधूला आपल्यासोबत घरी आणलं. 26 जून रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जियालाल हा मिठाई आणण्यासाठी जात असल्याचं सांगून घरापासून तीनशे मीटर अंतरावर असलेल्या क्वार्टर मार्केटमध्ये गेला. मात्र, तिथून तो घरी परतलाच नाही. कुटुंबीयांनी रात्री उशिरापर्यंत त्याच्या परत येण्याची वाट पाहिली, मात्र तो परत आला नाही. मंगळवारी सकाळी सासरच्या मंडळींशिवाय इतर नातेवाईकही तिथे पोहोचले आणि नवरदेवाचा शोध सुरू केला. मुलाचा ठावठिकाणा न लागल्याने कंटाळून जियालालचे वडील दिनेश महतो यांनी पनापूर पोलीस ठाण्यात अर्ज देत त्याच्या सुखरूप सुटकेची विनंती केली. याप्रकरणी पनापूर पोलीस तपास करत आहेत. बेपत्ता नवरदेवाचा अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. पोलिसांनी लग्नस्थळी अनेकांची चौकशी केली, मात्र असं असतानाही या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेलं नाही.