नवी दिल्ली, 8 जानेवारी : सरकारने पासपोर्ट बनवण्याचे नियम आता सोपे केले आहेत. त्यामुळे पासपोर्ट बनवणं सोपं झालं आहे. घरबसल्या पासपोर्टसाठी अप्लाय करता येऊ शकतं. त्यानंतर पुढील प्रोसेससाठी पासपोर्ट ऑफिस जाण्यासाठीची वेळ ठरवता येऊ शकते. आता सरकार पासपोर्ट प्रक्रिया आणखी सोपी करणार आहे. सरकार देशात ई-पासपोर्ट सर्विस सुरू करणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव संजय भट्टाचार्य यांनी एका ट्विटमध्ये भारतीय नागरिकांना लवकरच ई-पासपोर्ट मिळण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. e-passport आल्याने पासपोर्ट हरवण्याचा, जळण्याचा, किंवा खराब होण्याची चिंता नसेल. ई-पासपोर्ट कागदी पासपोर्टपेक्षा अधिक सुरक्षित असेल. सध्या भारतात पासपोर्ट बुकलेट रुपात आहे. परंतु ई-पासपोर्ट बायोमेट्रिक डेटासह सुरक्षित असतील. या पासपोर्टमुळे फ्रॉडसारख्या घटनांनाही आळा घालण्यास मदत होईल.
कसा असेल ई-पासपोर्ट - ट्रायलआधारे परराष्ट्र मंत्रालयाने जवळपास 20000 अधिकाऱ्यांचे ई-पासपोर्ट जारी केले आहेत. ई-पासपोर्टमध्ये इलेक्ट्रॉनिक मायक्रोप्रोसेसर चिप असते. पासपोर्ट पुढे चिप ई-पासपोर्टसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त लोगो असेल. e-passport साठी परराष्ट्र मंत्रालयाने टाटा कन्सल्टेन्सी सर्विसेजसह करार केला आहे. Passport Seva Programme च्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत मायक्रो चीप बनवलेल्या ई-पासपोर्टसाठी हा करार करण्यात आला आहे.
देशभरात 555 पासपोर्ट केंद्र - भारतात सध्या 555 पासपोर्ट केंद्र नेटवर्क असून यात 36 पासपोर्ट कार्यालयं, 93 पासपोर्ट सेवा केंद्र आणि 426 पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र आहेत.