मुंबई, 10 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) या सिझनमधील सर्व चार सामने गमावले आहेत. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सीएसकेची ही सर्वात खराब सुरूवात आहे. रविवारी झालेल्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादनं सीएसकेचा (SRH vs CSK) 8 विकेट्सनं पराभव केला. या पराभवाला जबाबदार कोण? असा प्रश्न आता विचारला जात आहे. त्यावर टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आयपीएल सिझन 15 सुरू होण्यापूर्वीच सीएसकेचा पराभव झाला होता. त्यांनी या सिझनपूर्वी केलेल्या एका चुकीमुळे सीएसकेची सध्याची अवस्था झाल्याचं शास्त्रींनी ‘इएसपीएन क्रिकइन्फो’ मधील कार्यक्रमात बोलताना हा दावा केला आहे. आयपीएल ऑक्शनपूर्वीच सीएसकेच्या मॅनेजमेंटकडून चूक झाल्याचं मत शास्त्रींनी यावेळी व्यक्त केलं. सीएसके टीम मॅनेजमेंटचा महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) जागी नवा कॅप्टन करण्याचा विचार सुरू होता तर त्यांनी फाफ ड्यू प्लेसिसला रिलीज करण्याची गरज नव्हती. धोनीचा उत्तराधिकारी म्हणून फाफ हा चांगला पर्याय होता. तो कॅप्टन झाला असता तर त्याच्या कॅप्टनसीमध्ये रविंद्र जडेजा किंवा धोनीच्या जागी होणारा सीएसकेचा अन्य कोणताही कॅप्टन अधिक मोकळेपणे खेळू शकला असता, ‘असं परखड मत शास्त्रींनी व्यक्त केलं आहे. सीएसकेनं रिलीज केल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं (RCB) फाफ ड्यू प्लेसिसला ऑक्शनमध्ये खरेदी केले. ड्यू प्लेसिसच्या कॅप्टनसीमध्ये आरसीबीनं 4 पैकी 3 सामने जिंकले असून पॉईंट टेबलमध्ये आरसीबी सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर सीएसकेची टीम 4 पराभवानंतर सर्वात तळाशी आहे. शास्त्रींनी जडेजाला दिला ‘गुरू’ मंत्र यापूर्वी ‘क्रिकइन्फो’वरील एका कार्यक्रमात बोलताना शास्त्रींनी जडेजाला ‘गुरू’ मंत्र दिला आहे. ‘रवींद्र जडेजाला स्वतःला कॅप्टन म्हणून सिद्ध करून चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंवर सकारात्मक प्रभाव टाकावा लागेल, त्यामुळे खूप फरक पडतो. तुम्ही आयपीएलमध्ये एका सर्वोत्तम कर्णधाराची जागा घेतली आहे आणि तुमच्याकडून धोनीसारख्या कॅप्टन्सीची अपेक्षा करणं रास्त आहे; मात्र धोनीची (M S Dhoni) जागा घेणं सोपं नाही. माझी इच्छा आहे, की जडेजाने कॅप्टन म्हणून स्वत:ला सिद्ध करावं. मला वाटतं, तो या बाबतीत थोडा कमी पडत आहे. IPL 2022 : RCB च्या स्टार खेळाडूच्या बहिणीचं निधन, आयपीएल सोडून तातडीनं घरी रवाना त्याने आपल्या खेळाडूंशी शक्य तितकं जास्त बोलायला हवं आणि मैदानावर काय चाललं आहे याबद्दल पूर्णपणे सजग राहावं अशी माझी इच्छा आहे. नव्या कॅप्टनने कारकिर्दीच्या सुरुवातीलाच अशा गोष्टी करायला हव्यात. कारण एकदा का तुम्ही कॅप्टन म्हणून बॉडी लँग्वेज दाखवायला सुरुवात केली, की टीममधल्या खेळाडूंवर याचा प्रभाव पडतो.’ असा मंत्र शास्त्रींनी दिला आहे.