राहुल कलाटे निवडणूक लढवण्यावर ठाम
पुणे, 10 फेब्रुवारी : सध्या चिंचवड पोटनिवडणुकीवरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे हे चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे. या बंडखोरीचा फटका हा या निवडणुकीत महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडींच्या नेत्यांकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी राहुल कलाटे यांची मनधरणी सुरू आहे. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता राहुल कलाटे यांनी एक अट घातली आहे. या अटीमुळे महाविकास आघाडीची कोंडी होण्याची शक्यता आहे. नेमकं काय म्हणाले राहुल कलाटे? बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्याकडून महाविकास आघाडीच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी ठाकरे गट आणि मविआच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र ही निवडणूक बिनविरोध झाली तरच मी अर्ज मागे घेतो, असं कलाटे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारानेही अर्ज मागे घ्यावा, ही निवडणूक बिनविरोध करावी आपणही आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ असं कलाटे यांनी म्हटलं आहे. कलाटे यांच्या या भूमिकेनंतर महाविकास आघाडी काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. हेही वाचा : Chinchwad by-election : ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं; संभाजी ब्रिगेड चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम तिरंगी लढत चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र बंडखोर उमेदवार राहुल कलाटे हे देखील पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आता चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, नाना काटे आणि राहुल कलाटे असा तिरंगी सामना होण्याची शक्यता आहे. या बंडखोरीचा फटका महविकास आघाडीला बसू शकतो.