राजनांदगांव 21 ऑगस्ट: कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशातल्या उद्योग धद्यांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. हजारो लोकांचा रोजगार बुडाला आहे. आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर काही व्यवसायांसाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र अजुनही काही व्यवसायांवर बंदी कायम आहे. त्यातलाच एक व्यवसाय म्हणजे बँड. लग्न समारंभ आणि इतर उत्सवांची सुरुवात ज्यांच्यापासून होते ती ही मंडळी सध्या बेरोजगार झाली आहे. त्यामुळे आम्हाला काम करण्याची परवानगी द्या या मागणीसाठी छत्तीसगडमधल्या राजनांदगावमध्ये आज बँडवाल्या लोकांनी वाजतगाजत मोर्चा काढला. त्यांच्या या मोर्चाने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. गेल्या पाच महिन्यांपासून ही मंडळी घरीच बसून आहेत. काम नसल्याने मिळकत नाही त्यामुळे घर कसं चालवायचं असा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. लग्न सराईचे दिवस असलेला उन्हाळा हातचा गेला. आता सणांच्या दिवसांमध्ये या मंडळींना सर्वात जास्त काम असते. गौरी-गणपती, नवरात्र, ते दिवाळीपर्यंत यांचा हंगाम असतो. तोही जर गेला तर मग करायचं काय असा या हजारो लोकांसमोर प्रश्न आहे.
त्यामुळे आम्हाला कामाची परवानगी द्या अशी त्यांची मागणी आहे. आम्ही सर्व नियमांचं पालन करण्यास तयार असल्याचंही त्यांच्या संघटनेचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या सगळ्या वाद्यांसह अनोखा मोर्चा काढून सरकार आणि प्रशासनाचं लक्ष वेधलं.