नवी दिल्ली, 10 मे : कोरोना व्हायरस (Coronavirus) रोखण्यासाठी 24 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या या तिसऱ्या टप्प्यात सरकार परप्रांतियांना आपआपल्या गावी जाण्याची परवानगी देत आहेत. अधिकतर प्रवाशांना कागदपत्रांची कमतरता असल्याने ट्रेनमधून आपल्या राज्यात जाण्याची संधी मिळत नाही. अशा परिस्थितीत ते विविध भयंकर परिस्थितीत आपल्या गावी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही मजूर पायी तर काही सायकलने आपल्या गावी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. कडक उन्हात पायी वा सायकलवर हजारो किलोमीटरचा प्रवास करणं जोखमीचं आहे. अनेक मजुरांसाठी हा प्रवास शेवटचा ठरत आहे. अशीच घटना मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यात समोर आली आहे. येथे महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशापर्यंत पायी जाण्याऱ्या तीन मजुरांचा रस्त्यातच मृत्यू झाला. हे तिघेजण गेल्या आठवड्यात पायीच आपल्या घराच्या दिशेने निघाले होते. डॉक्टरांनी प्राथमिक तपासानंतर सांगितले की, कडक उन्हात पायी चालणं आणि थकव्यामुळे त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली. त्यामुळे त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर अधिक स्पष्टता येईल असं डॉक्टरांनी सांगितलं. हे मजूर प्रयागराज जिल्ह्यातील छुडिया गावातील रहिवासी आहे. लल्लूराम (55), प्रेम बहादूर (50)आणि अनीस अहमद (42) अशी मृत झालेल्या मजुरांची नावे आहेत. जेव्हा ते मध्यप्रदेश-महाराष्ट्राच्या सीमावर सेंधवाजवळ पोहोचले तेव्हा त्यांची तब्येत बिघडली. महाराष्ट्रातील विविध भागातून प्रवास करीत ते इथपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित- कार्गो ऑपरेशनअंतर्गत चीनहून परतलेले एअर इंडियाचे पायलट कोरोना पॉझिटिव्ह भांडण झाल्याने फेसबुक फ्रेंडला भेटायला गेली पत्नी, पतीच्या जिवाला घोर