नवी दिल्ली, 06 ऑगस्ट: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक धोरण समितीच्या (RBI MPC) झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांनी याबाबत माहिती दिली आहे. आरबीआय मॉनेटरी पॉलिसी (RBI Monetary Policy) बाबत बोलताना दास यांनी ही माहिती दिली आहे. एकूण पाच सदस्य व्याजदरात कोणताही बदल न करण्याच्या बाजुने होते. व्याजदरात बदल न झाल्यामुळे रेपो रेट (Repo Rate) 4 टक्क्यांवर स्थिर राहणार आहे. आर्थिक धोरण समितीने यावेळी ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
आरबीआय व्याजदरात कोणताही बदल करत नाही आहे. सध्या रेपो रेट 4 टक्के आहे. यामध्ये 22 मे 2020 मध्ये बदल करण्यात आला होता. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अशी माहिती दिली की, रेपो रेट 4% तर रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्क्यांवर कायम राहिल. दास यांनी असे देखील म्हटले की अद्याप कोरोनाचं संकट टळलं नाही आहे. एमपीसीच्या (MPC) अपेक्षेनुसार अर्थव्यवस्थेत सुधारणा होत आहे. व्हॅक्सिनेशन अर्थव्यवस्थेत सुधारणा करत आहे. दास असं देखील म्हणाले की जून महिन्यात महागाई वाढली आहे. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास पुढे म्हणाले की, 2021-22 साठी जीडीपी ग्रोथ 9.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे.
रेपो रेट म्हणजे काय? दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. हे अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देतात. रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले की बँकाही ग्राहकांना देण्यात येणाऱ्या कर्जांचेही दर वाढतात.