मुंबई, 07 एप्रिल: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हवामानाची (Weather in Maharashtra) आंधळी कोशिंबीर सुरू आहे. महाराष्ट्रातील काही भागांत उन्हाच्या तीव्र झळा (Heat Wave) बसत आहेत. तर काही भागात ढगाळ वातावरण (Cloudy Weather) निर्माण होतं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबतचं इतर नागरिकांची मोठ्या प्रमाणात धांदल उडत आहे. आजही सुर्यानं विदर्भाला उसंत दिलेली नाही. विदर्भातील सर्व जिल्ह्यांत आज तापमानाने चाळीशीचा टप्पा पार गेला आहे. आज विदर्भातील सर्वाधिक तापमान चंद्रपुरात नोंदलं गेलं असून येथील तापमान 43.2 अंश सेल्सियसवर पोहचलं आहे. एकीकडे विदर्भात ऊन तापत असताना कोकणासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मागील काही दिवसांपासून 32-33 अंश सेल्सियस दरम्यान खेळणार मंबईतील वातावरण आज अचानक 3 अंशांनी वाढलं आहे. आज मुंबईत तापमानाचा पारा 35.8 अंश सेल्सिअसवर पोहचला आहे. त्यामुळे हवेतील दमटपणा, वाढती आर्द्रता आणि कोरोनाचा संसर्ग अशा विविध समस्यांमुळे मुंबईकर हवालदिल होताना दिसत आहे.
कोकणासह मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण मागील काही दिवसांपासून कोकणातील हवामानही स्थिर असून येथील तापमान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. पण आज कोकणातील काही भागात ढगाळ वातावरण आहे. तर मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेतील जिल्ह्यातही ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मागील आठवड्यातील तापमानवाढीमुळे त्रासलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. तर पुण्यातील हवामान कोरंड राहणावर असून तापमान चाळीशीच्या उंबरठ्यावर पोहचलं आहे. त्यामुळे पुण्यातील नागरिकांना तूर्तास दिलासा नाही. हे ही वाचा- राज्यभरातील कडक लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणणार? राजेश टोपेंचं स्पष्टीकरण विदर्भात पारा चढाच आज विदर्भात सर्वाधिक तापमान चंद्रपूरमध्ये (43.2) नोंदलं गेलं असून त्यापाठोपाठ अकोल्यातील तापमान 42.9 अंश सेल्सिअसवर पोहचलं आहे. तर अमरावती (41.0), बुलढाणा (40), ब्रम्हपुरी (42.4), गडचिरोली (40.6), गोंदिया (40.5), नागपूर (42.0), वर्धा (42.4), वाशिम (41) आणि यवतमाळ येथील तापमान 41.7 अंश सेल्सिअसवर पोहचलं आहे.