ट्रकचा अपघात
प्रतिनिधी किशोर गोमाशे, वाशिम : समृद्धी महामार्गावरील कारंजा ते दोनद दरम्यान जात असणारा ट्रक पुलाखाली कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर ट्रकला आग लागली. त्यामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली आहे. या घटनेत ट्रकमधील दोन जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हा ट्रक वाशिम जिल्ह्यातून कारंजा इथे निघाला होता. त्याच दरम्यान ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. हा ट्रक नाशिक जिल्ह्यातून कांदा भरून पश्चिम बंगालच्या कोलकत्ता इथं जात होता.
भरधाव ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून हा ट्रक समृद्धी महामार्गावरील एका पुलाखाली कोसळला त्यामुळे या ट्रकला आग लागली आणि त्यामध्ये चालक आणि त्याचा सहकारी हे दोघेही होरपळल्याने दोघांचे ही मृतदेह कोळसा झालेत. या दोघांची अद्याप ओळख पटली नसून कारंजा पोलीस पुढील तपास करत आहेत. या अपघाताचा अजून कारण समजू शकलं नाही. यामध्ये कांदे भरल्याचं दिसत आहे. आगीमुळे कांद्याचं आणि ट्रकचं मोठं नुकसान झालं आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.