अनुराग सुतकर, प्रतिनिधी
सोलापूर 30 मे : प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की मोठं घर असावं घरासमोर मोठी परसबाग असावी आणि त्या बागेत अनेक प्रकारची फुले आणि विविध विदेशी रोपे तिथे असावीत. शिवाय त्या गार्डनमध्येच म्हणजेच परसबागेत आपली सकाळची पहाट आणि सायंकाळची सांज वेळ तेथे घालवावी. परंतु कुणी जागे अभावी आणि कुणी वेळेअभावी या गोष्टी करण्याकडे वळत नाही. पण सोलापुरातील सुरेश नकाते यांनी अशी कोणतीही कारणे न सांगता व्हर्टिकल हँगिंग गार्डन आपल्या घरासमोरच उभं केलं आहे. टाकाऊचा वस्तूंचा उपयोग प्लास्टिकच्या बाटल्या पेंटिंगचे डबे तसेच अनेक प्रकारच्या कोल्ड्रिंकच्या बाटल्या टाकून न देता त्यांना छिद्र पाडून योग्य प्रकारे त्यात छोटी छोटी रोपे कसे लावता येतील हा त्यांनी प्रयोग करून पाहिला. आज जवळजवळ त्यांच्या घरासमोरील वापरात नसलेली दीडशे फूट भिंत त्यांनी चक्क व्हर्टिकल हँगिंग गार्डन म्हणून उभी केली आहे. शिवाय 70 ते 80 प्रकारची रोपे त्यांनी आपल्या गार्डनमध्ये लावलेली आहेत. सांभाळण्यासाठी अवघड असणारी अनेक औषधी स्वरूपातील दुर्मिळ झाडेही त्यांनी त्यांच्या गार्डनमध्ये लावलेली आहेत. सुरेश यांनी अनेक प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून हे व्हर्टिकल हँगिंग गार्डन उभं केलं आहे.
थंड वातावरण निर्मिती होईल सोलापुरात ऊन जास्त असते शिवाय त्यामानाने सोलापुरात झाडांची संख्या कमी असल्याने धुळीचे प्रमाण भयंकर वाढले आहे. त्यामध्ये आपल्या दारासमोर किंवा घराच्या पाठीमागे अशा प्रकारची व्हर्टिकल हँगिंग गार्डन जर उभे केले तर येत्या काळात घरात थोडसं थंड वातावरण निर्मिती होईल. सोलापुरातील गजबजलेला परिसर म्हणजेच नवी पेठ बाजारपेठ येथे बारड लॉटरीच्या समोर हे व्हर्टिकल हँगिंग गार्डन आपणास पहावयास मिळेल. शिवाय मी कधी ही माझ्या गार्डनला जे लोक भेट देतात त्यांना रोप देतो, असं निसर्गप्रेमी सुरेश नकाते सांगतात.
Solapur News : मुंबई-सोलापूर ‘वंदे भारत’ महाराष्ट्रात हिट, पाहा काय सांगते आकडेवारी Video
झाडांशी नातं इतक्या प्रकारच्या झाडांकडे लक्ष देत असताना मला ती झाडे बोलतात आणि झाडे सजीव कशी असतात याची प्रचिती मला नेहमीच पहावयास मिळते. मी कोणत्यातरी कामात व्यस्त असलो आणि एक दिवस माझी जर या झाडांना पाणी घालायची वेळ जर चुकली तर जेव्हा कधी मी त्या झाडाला पाहतो. त्यावेळेस ती झाडे कोमजलेली शिवाय त्यांची पाने थोडीशी पडलेली असे दिसतात तेव्हा ते मला बोलतात की मी पाणी नसल्यामुळे सुकलो आहे अशी भावना माझ्यामध्ये निर्माण होते आणि ते डोळ्यांनी स्पष्ट दिसते सुद्धा. त्यामुळे यांचं आणि माझं अजीवन असं नातं आता निर्माण झालं आहे, निसर्गप्रेमी सुरेश नकाते सांगतात.