JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दसरा मेळाव्यावरुन 'महाभारत', शिवाजी पार्कात कोणाची तोफ धडाडणार?

दसरा मेळाव्यावरुन 'महाभारत', शिवाजी पार्कात कोणाची तोफ धडाडणार?

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन आता राजकीय महाभारत रंगताना दिसत आहे.

जाहिरात

राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे फाईल फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 सप्टेंबर : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन आता राजकीय महाभारत रंगताना दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मुख्य शिवसेनेने काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेचा बंडखोर गट म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. दोघांना शिवाजी पार्क येथील मैदानावरच दसरा मेळावा घ्यायचा आहे. विशेष म्हणजे या दोघांच्या पाठोपाठ आता मनसेच्या गोटातही दसरा मेळावा भरवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर महाराष्ट्र सैनिकाच्या नावाने एक पत्र शेअर केलं आहे. या पत्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसदार असा उल्लेख करत दसरा मेळावा घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यावरुन पुढच्या काही दिवसांमध्ये राजकीय धूमशान रंगताना दिसणार आहे. “मी कुठला गटाचा तटाचा नाही. मी शिवसेनेचा आमदार आहे. गेली 15 वर्षी मी दसरा मेळाव्यासाठी अर्ज करतो. त्यानुसार मी यावर्षी देखील अर्ज केला आहे. दसरा मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन एकनाथ शिंदे यांचं असेल. मी शिवसेना म्हणूनच अर्ज केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार दसरा मेळाव्यात दिले जातील.प्रत्येक वर्षी आमदार म्हणून मीच दसरा मेळाव्यासाठी अर्ज करतो. दोन अर्जासाठी एक अर्ज निवडावा लागले. मी प्रत्येक वर्षी अर्ज करतो. त्यामुळे मला परवानगी मिळावी, अशी आमची भावना आहे”, अशी भूमिका सदा सरवणकर यांनी मांडली आहे. ( काँग्रेसमध्ये काय सुरूये? आधी अशोक चव्हाण, आता कलमाडींच्या पुणे फेस्टिवलमध्ये भाजप नेत्यांची रेलचेल ) दरम्यान, रामदास कदम यांनी देखील याबाबतचं एकनाथ शिंदेंना उद्देशून विधान केलं होतं. ‘बाळासाहेबांचे विचार घेऊन एकनाथ शिंदे चालले आहेत, तर शरद पवारांचे विचार घेऊन उद्धव ठाकरे चालले आहेत. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करण्याचं काम, त्यांच्या विचारांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत. मग त्यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा आणि विचार सांगण्याचा अधिकार कुठून आला? त्यामुळे एकनाथ शिंदेंनी दसरा मेळावा घ्यावा आणि शिवसेनेप्रमुखांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवावेत, असं माझं वैयक्तिक मत आहे, हे मत मी एकनाथ शिंदेंसमोर मांडणार आहे’, असंही रामदास कदम यांनी सांगितलं. दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील राज ठाकरेंना उद्देशून एक पत्र ट्विटरवर शेअर केलं आहे. “वंदनीय कै. बाळासाहेब ठाकरे आणि शि व से ना या चार अक्षरांवर प्रेम करणारा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणारा प्रत्येक मराठी आणि हिंदू व्यथित झाला आहे, गोंधळला आहे. त्याच्या मनातला हा गोंधळ दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. हिंदूंची मरगळलेली मनं पुन्हा एकदा चेतवण्याचे, मराठीजनांचा मानसिक गोंधळ दूर करण्याचे कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेली एकमेव व्यक्ती या महाराष्ट्रात आहे, ती म्हणजे आपण. हिंदूजननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे! म्हणूनच कोट्यवधी हिंदू तसंच मराठीजनांच्या वतीने आमच्यासारख्या लक्षावधी हिंदवी रक्षकांची, महाराष्ट्र सेवकांची आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की, दसऱ्याला आपण वंदनीय हिंदुहृदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर कडवी निष्ठा असणाऱ्या प्रत्येक हिंदूला, प्रत्येक मराठी मार्गाला मार्गदर्शन करावे,”, असं आवाहन संदीप देशपांडे यांनी केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या