मुंबई, 11 नोव्हेंबर : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली आणि सत्तास्थापनेची इच्छा व्यक्त केली. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेनेला राज्यपालांनी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंतची मुदत दिली होती. या मुदतीत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा सादर करू शकली नाही. काँग्रेसने केली कोंडी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा न दिल्याने सेनेची कोंडी झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पाठिंब्याची पत्रं शिवसेनेपर्यंत पोहोचू शकली नाहीत. शिवसेनेच्या नेत्यांनी राजभवनाबाहेर येऊन पत्रकारांशी संवाद साधला. राज्यपालांकडे आम्ही आणखी काही वेळ मागितला पण राज्यपालांनी त्याला नकार दिला, असं आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेनेनं सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी 3 दिवसांची मुदत मागितली पण ते पाठिंब्याची पत्रं सादर करू शकले नाहीत, असं राज्यपालांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटीसाठी बोलवलं दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चर्चा सुरू राहील, असं काँग्रेसचे नेते सांगत होते. महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीबद्दल आम्ही चर्चा केली, असं काँग्रेसच्या पत्रकात म्हटलं आहे. यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भेटीसाठी बोलवलं आहे. त्यानुसार आम्ही राज्यपालांना भेटण्यासाठी चाललो आहोत, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितलं. ========================================================================================