जितेंद्र जाधव, बारामती, 11 सप्टेंबर : ‘सत्ताधारी पक्ष पैशांची आणि विविध चौकश्यांची भीती दाखवत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडी चौकशी झाल्यापासून तेही बोलायचे कमी झाले आहेत,’ असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. कोहिनूर मिलप्रकरणी राज ठाकरे यांची काही दिवसांपूर्वी ईडीकडून चौकशी करण्यात आली. सरकारविरोधात भूमिका घेतल्यानेच राज ठाकरेंमागे ईडी चौकशीचा ससेमिरा लावण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. पण सरकारने कितीही चौकश्या लावल्या तरीही माझा आवाज बंद होणार नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. मात्र आता अजित पवार यांनी राज ठाकरे चौकशीनंतर बोलायचे कमी झाले आहेत, असं म्हणून खळबळ उडवून दिली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्यावरही भाष्य राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत काँग्रेस सोडणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांना अजित पवारांनी फटकारलं आहे. ‘तीन पिढ्या सरकारमध्ये असताना आणि मंत्रिपद देऊनही काही लोक पक्ष सोडून जात आहेत,’ असं म्हणत अजित पवार यांनी भाजप प्रवेशाच्या तयारीत असणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ‘अजित पवार एकदा दिलेला शब्द पाळतो. मग कितीही किंमत मोजावी लागली तरी तो पाळतो. हर्षवर्धन पाटील खोटे आरोप करत आहेत. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असा शब्द दिला होता,’ असा खुलासा अजित पवार यांनी दिला आहे. आम्ही हर्षवर्धन पाटील यांना 50 ते 55 फोन केले पण ते भेटले नाहीत. सांगायला काही नाही म्हणून ते आता राष्ट्रवादीवर आरोप करत आहेत, असा पलटवार अजित पवार यांनी केला आहे. VIDEO : हर्षवर्धन पाटलांसोबत मुलगी काँग्रेस सोडणार नाही? अंकिता पाटील म्हणतात…