नाशिकमधला इतिहासकालीन किल्ला धसला
नाशिक, 21 जुलै : इर्शाळवाडी दरड कोसळण्याची घटना ताजी असतानाच नाशिकमधला धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील इतिहासकालीन कावणई किल्ला धसला आहे. कावणईच्या डोंगरावर असलेला हा किल्ला आहे. बिटुरली गावाच्या बाजूने काही प्रमाणात हा किल्ला धसला आहे. यामध्ये किल्ल्याचं किती नुकसान झालं आहे, याची माहिती अजून समोर आली नाही. इर्शाळवाडीच्या जवळच असलेल्या मोरबेवाडीमध्येही आज दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मोरबेवाडीमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. इर्शाळवाडीमध्ये आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही तिकडे बचावकार्य सुरू आहे, पण सततच्या पावसामुळे बचावकार्यामध्ये अडथळा येत आहे.
मुख्यमंत्र्यांचं निवेदन इर्शाळवाडीच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन दिलं आहे. इर्शाळवाडीमध्ये 17 ते 18 घरांवर डोंगर कोसळला, एवढी अडचणीची जागा होती की आपल्याकडे यंत्रणा असून देखील आपण ती वापरू शकत नव्हतो. कालच्या दिवसभरात 20 लोकांचे मृतदेह सापडले आहेत, तर 119 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. दुर्गम भाग, वादळवारा, पाऊस परिस्थिती यांमुळे परिस्थिती कठीण होती. NDRF 4 टीम, अन्य अनेक पथके, स्वयंसेवी संस्था, रेस्क्यू टीम यांनी मोलाची कामगिरी बजावल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर करून कायमस्वरुपी पुनर्वसनाचा निर्णय घेतला असल्याची माहितीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.