कोल्हापूर, 09 सप्टेंबर : कोल्हापूर पोलिसांनी ती राज्यात दहशत माजवणाऱ्या टोळीला गजाआड केले आहे. काल (दि.09) गुरुवारी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर थरारक पाठलाग करत राजस्थान, गुजरात, पंजाबमध्ये दहशत माजवणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळ्याने कोल्हापूर पोलिसांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. (Kolhapur Police) कोगनोळी टोल नाक्यावर नाकाबंदी करून म्होरक्या कुलदीप सिंहसह पाचही गुंडांना बेड्या ठोकण्यात आल्या. अंदाधुंद गोळीबार, रक्तपात घडवून पसार झालेल्या राजस्थानातील कुलदीप सिंह टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषणसह वडगाव व कागल पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
यामध्ये कुलदीप कुंवरजित सिंह (वय 28, रा. भरतपूर), प्रभव महावीर सिंह (21), विश्वेंदर विजेंदर सिंह (28, रा. पाली, भरतपूर), राहुल परमवीर सिंह (28), विजय वीरेंदर सिंह (28, रा. भरतपूर, राजस्थान) अशी त्यांची नावे आहेत. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, किरण भोसले, वडगावचे निरीक्षक तळेकर, कागलचे अजयकुमार जाधव यांच्यासह पोलिसांच्या जिगरबाज कामगिरीमुळे राजस्थानातून पळ काढून गोव्याला पलायन करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
हे ही वाचा : महाप्रसादाच्या कार्यक्रमात गोळीबार, गणेशोत्सवाला गालबोट, धक्कादायक घटनेने कोल्हापूर हादरलं
गुजरातमधील भरतपूरमध्ये या टोळीने मागच्या 5 दिवसांपूर्वी प्रचंड दहशत माजविली होती. यामध्ये जमीन वादातून अंदाधुंद गोळीबार करून एकाची हत्या करण्यात केली होती. तर दोघांच्या खुनाचा प्रयत्न झाला होता. या घटनेमुळे राजस्थानचे पोलिस त्यांच्या मागावर होते. याबाबत कोल्हापूर पोलिसांना याची खबर लागताच सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली होती. कोल्हापूर आणि कर्नाटकची सीमा असलेल्या कोगनोळी टोलनाक्यावर या टोळीला जेरबंद करण्यात आले.
राजस्थानसह गुजरात आणि पंजाबमध्ये या टोळीची प्रचंड दहशत आहे. टोळीतील साथीदार पुणे-बंगळूर महामार्गावरून कारमधून गोव्याला जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पोलिसांना सतर्कतेच्या सूचना केल्या होत्या.
हे ही वाचा : गणपती विसर्जन करताना तरूण नदीत बुडाला, इचलकरंजीचे लोकप्रतिनीधी जबाबदारी घेणार का?
पोलिसांचा मोठा फौजफाटा महामार्गावर तैनात करण्यात आला. वडगाव पोलिसांना चकवा देत ही टोळी महामार्गावरून कागलच्या दिशेने सुसाट गेली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजय गोर्ले, अजयकुमार जाधव यांच्यासह पथकाने थरारक पाठलाग केला. महामार्गावरील कोगनोळी टोल नाक्याजवळ सर्व मार्गांवर नाकाबंदी केली व या टोळीच्या कारला घेरले. पोलिसांनी एकाचवेळी गराडा घालून 5 जणांच्या मुसक्या आवळल्या.