heat-wave
भुसावळ : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तापमान वाढत आहे. जीव नको असं झालं आहे. उष्णता एवढी जास्त आहे की बाहेर गेल्यावर उन्हाचे चटके बसत आहेत. त्यात गोंदिया भुसावळ जिल्ह्यांमध्ये तर तापमान 41 ते 43 अंश आहे. खारघरमध्ये नुकतंच महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने 13 अनुयायांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ताजी असताना आता एक धक्कादायक बातमी येत आहे. भुसावळ जिल्ह्यात १३ एप्रिलनंतर सोमवारी पाचव्या दिवशी कमाल तापमान पुन्हा ४३.३ अंश नोंदवले गेले. शहरातील केंद्रीय जल आयोग कार्यालयात ही नोंद झाली. दरम्यान, पश्चिमी भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे एप्रिलच्या उर्वरित १३ दिवस तापमानाचा ४२ ते ४७ अंशांदरम्यान राहील. प्रामुख्याने २९ एप्रिल रोजी ते उच्चांकी ४७ अंशांपर्यंत पोहोचू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे आतापर्यंत मिळालेला दिलासादायक काळ संपुष्टात आला असून, वातावरण स्वच्छ होताच सूर्याचा रुद्रावतार बघावयास मिळत आहे. उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतच चालला असून, रविवारी 41 अंशांवर असलेला पारा सोमवारी मात्र थेट 41.8 अंशावर गेला होता. उन्हाच्या वाढत्या तडाख्याने आता जिल्हावासी होरपळून निघत आहेत. हवामान खात्याचा आतापर्यंतचा अंदाज बरोबर निघाला व मार्च, तसेच एप्रिल महिन्यातील 10 दिवस कधी ढगाळ वातावरण व कधी पावसामुळे थंडगार गेले. मात्र, आता वातावरण स्वच्छ झाले असून, हवामान खात्याचा अंदाज असूनही पाऊस पडलेला नाही. उलट स्वच्छ वातावरणामुळे तापमान वाढत चालले असून, उन्हामुळे आता जिल्हावासीयांना घराबाहेर पडणे कठीण होऊ लागले आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्याचा पारा 41 अंशांवर गेला आहे. तर, सोमवारी पारा थेट 41.8 अंशावर गेला होता. आता खऱ्या अर्थाने उन्हाळा सुरू झाल्याचे जाणवत आहे.