मुंबई 04 मार्च : राज्यातील वीजग्राहकांना दिलासा देणारे निर्देश वीज नियामक आयोगाने (Electricity Regulatory Commission)दिले आहेत. या निर्देशानुसार १ एप्रिलपासून राज्यातील वीजदर सुमारे २ टक्क्यांनी कमी (Reduce Electricity Costs)करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात इंधन दरवाढ आणि सक्तीच्या वीज देयक वसुलीने हैराण असलेल्या सामान्य नागरिकांना यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. नियामक आयोगाने सुनावणी दरम्यान एफएसी (इंधन समायोजन उपकर) फंडाच्या माध्यमातून वीज कंपन्यांना फंडाचा वापर करून ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश दिले आहेत. मार्च २०२० मध्ये या FACच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्यास सुरुवात झाली. मार्च २० ते मार्च २१ पर्यंत सर्व रहिवासी, दुकान, कंपनी, उद्योगासाठी १० टक्के वीजदर कमी करण्यात आले. मात्र, याबाबत लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी म्हटलं, की विजेचे दर २ टक्के कमी झाले आहेत का? हे तपासण्याची गरज आहे. यामागचं कारणही त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी ७ टक्क्यांनी विजेचे दर कमी झाले, असं सांगण्यात आलं होतं. प्रत्यक्षात मात्र विजेचे दर ७ टक्के वाढले होते. याशिवाय गेल्या वर्षी पंचवार्षिक ऑर्डर झाली आहे. आता कोणतीही नवी ऑर्डर झालेली नाही. बहुवार्षिक ऑर्डरमध्ये २० आणि २१ यांची तुलना करावी लागेल. तुलना केल्यानंतर वाढ झाली की घट झाली, हे समजेल, असंही ते म्हणाले. आतासुद्धा एका विभागात कुठे तरी कमी झाले असतील. सगळ्या विभागात विजेचे दर कमी झाले आहेत का? ते तपासावं लागेल. सगळ्या विभागात विजेचे दर कमी झाले असतील; असे म्हणता येत नाही. त्यामुळे,शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत ठोस निर्णय घ्यायला हवा, असंही वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यावेळी बोलताना म्हणाले.