रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 16 जून : पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडुनिया गाठ… अशा भक्तीमय गितांनी वारकरी पंढरपूरला पावलो पावली सध्या जवळ करत आहेत. दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी निम्मित विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथून निघालेला पालखी सोहळा आज बीडमध्ये दाखल झाला. यावेळी संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याचे बीड शहरात स्वागत करण्यात आले. 300 वर्षांपेक्षा अधिक जुना इतिहास संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याला 300 वर्षांपेक्षा अधिक जुना इतिहास आहे. मागील 300 वर्षांपासून अविरतपणे ही पालखी न चुकता बीड नगरीत येत असते. टाळ मृदंग आणि विठुरायाच्या गजरात ही पालखी बीड शहरात आगमन करत असते आणि बीडवासीय मोठ्या उत्साहाने या पालखीचं पुष्पवर्षाव करून स्वागत करतात. ही परंपरा आज पर्यंत टिकून आहे.
पालखीचे वैशिष्ट्य संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत सोपान काकांनी समाधी घेतल्यावर सर्वात धाकटी बहीण संत मुक्ताबाई तापीतीरी अंतरध्यान पावल्या. त्यांचे समाधीस्थळ कोथळी-मुक्ताईनगर आणि मेहूण अशा दोन ठिकाणी दाखवले जाते. मुक्ताबाई इतर भावंडांप्रमाणे समाधी न घेता त्या गुप्त झाल्यामुळे या मंदिरांमध्ये त्यांच्या पादुका वा समाधी नसून मूर्ती आहे. दोन्ही ठिकाणांहून त्यांची पालखी आषाढीसाठी पंढरपूरला जाते. आषाढ शुद्ध दशमीला पंढरपूरला ज्या सात पालख्य़ा शेवटी असतात, त्यात कोथळीतील संत मुक्ताबाई यांची पालखी सहाव्या क्रमांकावर असते. पालखी प्रस्थान ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला होते. कोथळी ते पंढरपूर अंतर साधारण 485 कि.मी. इतके आहे, वरील पंढरपूर गाठण्यासाठी 33-34 दिवस लागतात. कोथळीजवळच मुक्ताईनगरात मुक्ताबाईंचे नवीन मंदिर आहे. कोथळीत प्रस्थान झाल्यावर पहिला विसावा नवीन मुक्ताईनगर मंदिर येथे होतो. बीड येथे पालखीचे जोरात स्वागत होते. बीड येथे मुक्ताबाईंच्या आजोबांची समाधी आहे. त्यामुळे हे महत्त्वाचे ठिकाण आहे.
Ashadhi Wari 2023: आषाढी वारीत अवतरले गाडगेमहाराज, पाहा काय दिला संदेश Video
बीडमध्ये दोन दिवस मुक्ताबाईंच्या पालखीचा मुक्काम माळीवेस येथील हनुमान मंदिरात पालखीचा दोन दिवस मुक्काम असून शनिवारी सकाळी शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानंतर पालखी पेठबीड भागातील बालाजी मंदिरात मुक्कामी राहणार आहे. रविवारी सकाळी पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल.